बीड : मराठवाड्यातील शेतकऱ्याला कधी अतिवृष्टीचा तर कधी दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच यंदा म्हणावा तसा पाऊस न झाल्याने अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यावरील या संकटामुळे आत्महत्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मराठवाड्यात गेल्या आठ महिन्यांत म्हणजेच 1 जानेवारीपासून ते 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील तब्बल 685 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपले जीवन संपवले आहे. अंगावर शहारे आणणारा हा आकडा शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक असल्याचे बोलले जात आहे. यावरून नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
“बीड जिल्ह्यात आणि राज्यातच शेतकरी आत्महत्या होत आहेत. कृषी धोरण ब्रिटिशांनी केलेलं आहे, त्यात बदल झालेला नाही. लाँग टर्म पॉलिसी यायला हवी. कृषीमंत्री सध्या उत्तर सभा घेण्यात व्यस्त आहे. सध्या जे राजकारणात चालू आहे, त्यात लोकांना रस नाही. लोकांची कामं होणं गरजेचं आहे. शेतकरी आत्महत्या रोखणं सध्याचं मोठं आव्हान आहे,” असे संभाजीराजे म्हणाले.
दरम्यान, कर्जबाजारीपणा तसेच नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. औरंगाबाद 95, बीड – 186, जालना -50, लातूर -51, परभणी -58, नांदेड -110, उस्मानाबाद 113, बीड -186 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आठ महिन्यातील आत्महत्याची ही आकडेवारी आहे.