मुंबई – अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी खास करून ओळखले जातात. राजकीय आणि सामाजिक विषयांवर अनेकदा ते आपले मत मांडताना दिसतात. अनेकदा त्यांच्या विधानामुळे त्यांच्यावर टीका देखील केली जाते. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द केरळ स्टोरी’, आणि ‘गदर 2’ यांसारख्या चित्रपटांवर निशाणा साधला आहे. असे चित्रपट हिट होताना पाहून खूप त्रास होतो, असं ते म्हणाले आहेत. त्यांचे हे विधान चांगलेच चर्चेत आले आहे.
बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्यामागचा उद्देश बदलला का? या प्रश्नावर नसीरुद्दीन शाह म्हणाले की, “हो, आता तुम्ही जितके अधिक देशभक्त असाल, तितके अधिक तुम्ही लोकप्रिय होताल. कारण सध्या देशात त्याच गोष्टीचं राज्य आहे. आता फक्त तुमच्या देशावर प्रेम करणं पुरेसं राहिलेलं नाही. पण जोरजोरात ढोल वाजवून आणि काल्पनिक शत्रू निर्माण करून तुम्हाला ते सिद्ध करावं लागतंय. या लोकांना ही गोष्ट समजत नाहीये की ते जे करत आहेत ते खूप हानीकारक आहे.”
“द केरळ स्टोरी आणि गदर 2 यांसारखे चित्रपट मी पाहिले नाहीत पण मला माहीत आहे की ते कशाबद्दल आहेत. द काश्मीर फाइल्ससारखा चित्रपट इतका लोकप्रिय होत असल्याचं पाहून खूप त्रास होतो. दुसरीकडे सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा आणि हंसल मेहता हे जेव्हा चित्रपटांमधून सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना लोकप्रियता मिळत नाही. पण हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की असं असूनही ही लोकं चित्रपटांद्वारे त्यांच्या कथा सांगण्याचं काम थांबवत नाहीत”, असंही शाह म्हणाले.
‘गदर 2’ चित्रपटाबाबत नसीरुद्दीन शाह म्हणाले, “चांगले दिग्दर्शक हे चांगली पिढी घडवण्यासाठी जबाबदार असतात. शंभर वर्षांनंतर लोक ‘भीड’ हा चित्रपट पाहिल्यानंतर जेव्हा ‘गदर 2’ पाहतील, तेव्हा आपल्या काळातील कोणत्या चित्रपटातून सत्य मांडले हे जाणून घेतील. कारण चित्रपट हे एकमेव माध्यम आहे, ज्यामधून हे साध्य होऊ शकतं. आयुष्य जसं आहे तसं दाखवणं खूप कठीण आहे. कोणत्याही कारणाशिवाय सर्व चुकीच्या गोष्टी दाखवणारे आणि इतर समाजाला कमी लेखणारे चित्रपट बनवण्यात चित्रपट निर्माते गुंतले आहेत हे भयावह आहे. जिथे सर्व चुकीच्या गोष्टींचं कौतुक केलं जातं आणि इतर समुदायाला कोणत्याही कारणाशिवाय खाली पाडलं जातं. हे खूप भयानक आहे.”
दरम्यान, नसीरुद्दीन शाह यांनी 17 वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केले आहे. ‘मॅन वुमन मॅन वुमन’ या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केले आहे. यानिमित्त घेतलेल्या मुलाखतीत त्यांना दिग्दर्शन क्षेत्रात कमबॅक करण्यासाठी 17 वर्ष वाट का पाहावी लागली? , असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मी वाईट चित्रपट बनवल्याच्या धक्क्यातून सावरत होतो. मला जशी अपेक्षा होती, तसा तो बनला नव्हता. त्यावेळी पटकथालेखनाच्या बाबतीत किंवा चित्रपटाच्या बाबतीत पुरेसं तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. मी फक्त असा विचार केली की जर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांना एकत्र आणलं तर उत्तम चित्रपट बनू शकेल. मला स्क्रिप्टसुद्धा ठीक वाटली होती. पण एडिटिंग करताना विशेष करून इरफान खानच्या कथेत काही त्रुटी दिसून आल्या. माझ्यासाठी ती खूप मोठी निराशा होती.”