आजवर अनेक लेखक, कवींनी आईची महती सांगितली आहे. “देव सर्वत्र राहू शकत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली’ असेही एक अरबी वचन आहे. “आई’ हा शब्द असा मंत्र असतो, जो आपल्याला वादळ वाऱ्यातून तारुन नेतो. शक्ती देतो.
छत्रपती शिवराय स्वत: स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता म्हणायचे. आपल्या तान्ह्या लेकरासाठी जीव पणाला लावणाऱ्या रायबागनच्या हिरकणीच्या साहसी मातृप्रेमाचा त्यांनी सन्मान केला. “तुमच्यासारखी निर्भीड आई स्वराज्यात आहे, तोपर्यंत ते कोणालाही जिंकता येणार नाही… ते अजिंक्यच राहणार..’
आई या शब्दाला जसा भावनिक पदर आहे, तसा एक ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आदरही आहे. आईचे आईपण जेव्हा व्यापक पातळीवर पोहचते, तेव्हा तिला माऊली म्हंटले जाते.
तू माझी माऊली । मी हो तुझा तान्हा ।
पाजी प्रेम पान्हा । पांडुरंगे ।।
संत नामदेव पांडुरंगाला माऊली म्हणतात, वारकरी संप्रदायात ज्ञानाई, तुकाई, विठाई अशी नावे रुढ आहेत. सात्विक पुरुषांना, संत,साधूंना “माऊली’ म्हणण्याची प्रथा आहे. मानवता, ऊर्जा आणि लिनता यांचा संगम “माऊली’ या शब्दांत आहे. माऊली उपाधी प्राप्त होण्यासाठी अंतरंगात मांगल्य, सेवा, समर्पण भाव असावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचे सोशिकता आणि संयम हा स्वभावधर्म असावा लागतो. करुणा आणि वात्सल्य या मूल्यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे आई असते. आई हे मांगल्याचे मंदिर असते.
आपण पाहतो, की ज्या घरात लहान मुलं बागडत असतात, त्या घराच्या भिंती बोलक्या असतात. पण ज्या घरात आई सन्मानाने वावरत असते त्या घराच्या भिंती भक्कम असतात. आजच्या त्रिकोणी वा चौकोनी कुटुंबात आई सन्मानाने जपली जात असेल तर ते घर जणू उद्यान असते. अन्यथा ते स्मशान..! आई वृद्ध झाली की तिच्या अंगावर सुरकुत्या येतात. त्या सुरकुत्या या अनुभव संपन्नतेच्या रेषा असतात. त्यातूनच लेकरांच्या जीवनाची रांगोळी साकार झालेली असते.
मंडळी, आईचा वाढदिवस घरोघर मातृ उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. आपण आपट्याच्या पानाने दसरा साजरा करतो. आंब्याच्या पानाने पाडवा साजरा करतो. पण आईच्या तळहाताच्या पानाने आपले उभे आयुष्य साजरे झालेले असते. जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यात आपल्याला आईकडून एक वेगळं बळ मिळतं. मुलं अंगणात खेळतात, शाळा महाविद्यालयात वाढतात, पण आईच्या मांडीवर ती खऱ्या अर्थाने घडतात. म्हणून आईची मांडी हे लेकरांसाठी पहिले जागृत संस्कारपीठ असते.
आईने भेटण्याची आर्त हाक दिल्यावर ईश्वरचंद्र विद्यासागर तडक निघाले. मध्यरात्र झाली. दामोदर नदीला महापूर आला होता. जीवाची पर्वा न करता पूरात उडी मारली. पोहत पोहत काठावर आले. ओल्याचिंब अंगाने आईला भेटले. भिजलेल्या लेकराकडे पाहून आईचे डोळे पाणावले.
“ईश्वरा… पाण्याला ओढ होती रे…’
ईश्वरचंद्र म्हणाले, आई पाण्याला पाण्याची ओढ होती, पण मला तुझी ओढ होती. लेकरा पाण्याकडे हत्तीचे बळ होते. पाण्याने तुला गिळले असते. आई, पाण्याकडे हत्तीचे बळ असले तरी माझ्याकडे आई नावाचा मंत्र होता. त्यानेच मला तारले…
आईचे हे महात्म्य ज्यांनी जाणले ते खरे अमृतपुत्र. स्त्री क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. हे वाक्य आपण अनेकवेळा ऐकले. माझ्या वाचनात आले. गांधीजी लंकेला एका सभेसाठी गेले होते. सोबत कस्तुरबा होत्या. तिथल्या सभेत गांधीजींचा परिचय करून देणाऱ्या व्यक्तीला वाटलं की, कस्तुरबा या गांधींच्या आईच आहेत आणि त्यांनी तसा परिचय करून दिला. तो ऐकून कस्तुरबा थोड्या अस्वस्थ झाल्या. गांधींचे सेक्रेटरी घाबरले. त्यांना वाटलं की, आपण संयोजकांना अगोदर सांगायला हवं होतं की कस्तुरबा या गांधींच्या पत्नी आहेत.
बापूजी आपल्यावर रागावणार असे वाटत असतानाच, गांधीजी शांतपणे हसत हसत आपल्या भाषणात म्हणाले,”माझ्या या भावाने माझा जो परिचय करून दिला, त्यात चुकीने एक खरी गोष्ट सांगितली. काही वर्षे बा ही माझी पत्नी नाही तर माझी आई झाली आहे.’ खरा कर्मयोगी तो असतो, ज्याची पत्नी ही त्याच्यासाठी आई होते आणि खरी कर्मयोगिनी तीच असते की जी आपल्या पतीला मुलाप्रमाणे वागवते. आईचं हे आईपण हेच आपल्या संस्कृतीचं देवपण मोठेपण आहे.
डॉ. यशवंत पाटणे