मुंबई – 2024 ला सत्तेत येऊ असे आदित्य ठाकरे यांनी झोपेतून उठल्यासारखे विधान केले आहे. मला त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे वाटते. ज्या स्मार्ट सिटीच्या कामाचे आदित्य यांनी उद्घाटन केलं, त्याच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाला त्यांचे वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मंत्र्याने विरोध केला होता, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.
स्मार्ट सिटी ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आदित्य यांनी किमान मोदींचा उल्लेख करायला हवा होता, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल कल्याण-डोंबिवलीमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडले. डोंबिवलीत कॉंक्रिट रस्त्याच्या कार्यक्रमावेळी आदित्य ठाकरे यांनी 2024 नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल, असे सांगत शिवसेनेचे 2024 चे लक्ष्य दिल्ली असल्याचे सूचक विधान केले होते.
आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर चव्हाण यांनी टीका केली. आदित्य यांना 2024मध्ये सत्तेत येण्याची स्वप्न पडायला लागली आहेत. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ त्यांनी पुन्हा एकदा तपासून पाहिला पाहिजे किंवा त्यांच्यावर काहीतरी मानसिक परिणाम झालेला आहे, अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी केली. दरम्यान, चव्हाण यांच्या या टीकेनंतर स्थानिक शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.