सातारा दि. 04 (प्रतिनिधी) – मायणी (ता. खटाव) येथे मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे आज (शनिवार) जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.सालकुटे यांच्यापुढे शरण आले आहेत. त्यानंतर त्यांच्या जामीनावर सुनावणी होणार असून निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे. ज्या प्रतिज्ञापत्रावरून हा गुन्हा दाखल झाला त्या प्रतिज्ञापत्रावरील सही ही आ. जयकुमार गोरे यांचीची असल्याचा अहवाल हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल आला आहे.
याबाबत माहिती अशी, मायणी येथील भिसे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला असतानाही, ते जिवंत असल्याचे भासवण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून, त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर वडूज येथील सत्र न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यावर आ.गोरेंच्यावतीने उच्च न्यायालयात जामीनअर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेताना आ. गोरे यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांचा नियमीत जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी सर्वोच न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अचानक या गुन्ह्याचे तपासी अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्याकडून तपास काढला होता. त्यानंतर हा तपास कोरेगावचे डीवायएसपी गणेश किंद्रे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. अचानक तपासी अधिकारी बदलल्याने तक्रारदाराने एसपींच्या या आदेशाला थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तत्कालीन तपासी अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांनाही या गुन्ह्यात तपासी अधिकारी म्हणून पुन्हा नेमण्याचे आदेश एसपींना दिले होते. त्यानंतर आज (शनिवार) आ. जयकुमार गोरे हे स्वत:हून जिल्हा व सत्र न्यायालयात शरण आले आहेत.
या खटल्यात दोन्ही बाजूकडून कायद्याचा खिस पाडण्यासाठी जिल्ह्यातील नामवंत वकीलांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच सरकार पक्षाच्यावतीने ऍड. मिलींद ओक हे काम पाहत असून त्यांनी वादग्रस्त प्रतिज्ञापत्रावरील सही आ.गोरेंची असल्याचा हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल न्यायालयासमोर ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आ.गोरे यांच्या जामीन अर्जावर काय निकाल लागतो, याकडे जिल्ह्याच्या नजरा लागून राहील्या आहेत.