मुंबई : मदरशामध्ये शिक्षण घेणारी पाच अल्पवयीन मुले शिक्षकांच्या अमानुषपणे होणाऱ्या जाचाला कंटाळून आपल्या गावी बिहार येथे जाण्यासाठी निघाले. कळव्याहून कल्याणच्या दिशेने ट्रेनने प्रवास करत असताना एका दक्ष महिला प्रवाशाने याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात या पाचही मुलांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांची रवानगी उल्हासनगर येथील बालसुधारगृहात करण्यात आहे.
डोंबिवली जीआरपीने या प्रकरणी संबधित मदरसामधील दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करत हास्ने गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. याबाबत रेल्वे पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. 1 ऑगस्ट रोजी एका ट्रेनमध्ये पाच अल्पवयीन मुले बसली होती. ही मुलं बिहार येथे आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. मात्र लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने या मुलांची चर्चा ऐकली. त्यांच्या चर्चेवरुन मुलांसोबत काही तरी गैरप्रकार झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.
महिलेने तात्काळ रेल्वे कंट्रोलला फोन करत याबाबत माहिती दिली. डोंबिवली जीआरपीने या पाचही मुलांना तत्काळ डोंबिवली रेल्वे पोलीस स्थानकात उतरवून घेतले. पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा ही सर्व मुले बिहार येथील असून त्यांना पुन्हा बिहारला जायचे होते. त्यांच्या कुटुंबाने त्यांना शिक्षण घेण्यासाठी कळवा येथील मदरशात पाठवले होते. मात्र त्या मदरशामध्ये शिक्षकांकडून त्यांना मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे या मुलांनी तेथून पळ काढला. रेल्वे पोलिसांनी या मुलांना चाईल्ड वेल्फेर कमिटीसमोर हजर करण्यात आले.
या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात संबंधित मदरशाच्या दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित गुन्हा कळवा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे डोंबिवली रेल्वे पोलिसांनी सांगितले. मात्र याबाबत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.