मुंबई – मेट्रो-6चे कारशेड अखेर कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार कांजूरमार्ग येथील 15 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशच राज्य शासनाने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो कारशेडसाठी आरेचा हट्ट सोडल्याची चर्चा आहे.
कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गावरील मेट्रो-3चे कारशेड आरे येथे व्हावे यावरुन राजकीय नाट्य रंगले होते. आरे येथे मेट्रोचे कारशेड व्हावे असा हट्ट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात झाला होता. याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. आदित्य ठाकरे यांनीही याला विरोध केला होता.
महाविकास आघाडीच्या काळात हा निर्णय रद्द करण्यात आला. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित करण्यात आली. या जागेच्या हस्तांतरणावरुन वाद झाला. त्यामुळे कांजूरमार्ग येथे कारशेड होऊ शकले नाही. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो कारशेड आरेतच होणार असल्याचे जाहिर केले.
मात्र, आता मेट्रो 6 चे काम वेगात सुरु आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारी मेट्रो 6 ची सेवा 2025 पर्यंत सुरु करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. त्यासाठी एमएमआरडीएने वेगाने काम सुरु केले आहे. यात अडथळा येऊ नये यासाठी मेट्रो-6 चे कारशेड कांजूरमार्ग येथे करण्यास शिंदे-फडणवीस सरकारने मंजूरी दिली आहे. तसे आदेशच राज्य शासनाने दिले असल्याची माहिती आहे. ही जागा हस्तांतरीत करण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. त्याचीही तयारी करण्याचे निर्देश शासनाने एमएमआरडीएला दिल्याचे वृत्त आहे.
…तर दहा हजार कोटी वाचले असते – आदित्य ठाकरे
सर्व मेट्रोचे कारशेड कांजूरमार्ग येथे व्हावे, असे आमचे नियोजन होते. तसे झाले असते तर सरकारचे दहा हजार कोटी वाचले असते. आरेचे जंगल वाचले असते. मात्र केंद्र सरकार आणि खाजगी बिल्डरने न्यायालयात याचिका केली होती. ही याचिका अचानक गायब कशी झाली.
केंद्र सरकार आणि तो बिल्डर कुठे गेला, असे अनेक प्रश्न माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी उपस्थित केले. महाविकास आघाडी सरकारने 44 हेक्टर जागेचे नियोजन मेट्रो कारशेडसाठी केले होते. आता केवळ 15 हेक्टर जागा कारशेडसाठी दिली जाणार आहे. उर्वरित जागा नेमकी कोणाला दिली जाणार, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.