सातारा – समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पद्धतीचे काम माध्यमांनी करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले आदी उपस्थित होते. पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कडक कायदे होण्यासाठी आम्ही आग्रही असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले. “निर्भिड पत्रकारितेसाठी ते गरजेचे आहे. पत्रकारितेतील सुरुवातीच्या काळासाठी त्यांना काही विद्यावेतन देता येईल का, याचाही अभ्यास करु. पत्रकारांना आरोग्य, मुलांना शिक्षण तसेच राहण्यासाठी घरे याबरोबर जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “”संघटनेने स्थानिक स्तरावर नियमावली तयार करुन द्यावी. त्याआधारे त्यांना अधिकृत म्हणून ओळखपत्र देण्याविषयी कार्यवाही करता येईल. टेंभू (ता. कराड) येथील गोपाळ गणेश आगरकर यांचे स्मारक व्हावे, या पत्रकारांच्या मागणीचा विचार करुन ग्रामविकास विभागाशी पाठपुरावा केला जाईल. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन या स्मारकाविषयी असलेल्या अडचणी सोडवून ते नक्की मार्गी लावू.”
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, “”आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल पत्रकारिता ही संकल्पना झपाट्याने विस्तारत आहेत. माध्यमाची पोहोच आणि गतीमानता ही बलस्थाने लक्षात घेवून डिजिटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे आहे. लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण आहे. आज झालेल्या अधिवेशनात ज्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. त्याचा सकारात्मक विचार करुन सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.”
पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. आजची पत्रकारिता बदलली असून त्याला आधुनिकतेची जोड मिळत आहे. पत्रकारांनी सत्याला वाचा फोडून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका बजावावी, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. संघटनेचे अध्यक्ष माने यांनी प्रास्ताविकात संघटनेची भूमिका विषद करुन डिजिटल माध्यमांचे महत्व सांगितले. तसेच त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी आणि समस्या याविषयी माहिती दिली. डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधी कोण चुकत असेल तर त्या चुकाही वेळीच निर्देशनास आणून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्मरणिका, पुस्तक व विविध दिवाळी अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विश्वासार्हता निर्माण करावी : मुख्यमंत्री शिंदे
कोणत्याही प्रकारची बातमी लोकांपर्यंत क्षणार्धात पोहचविण्याचे काम डिजिटल मीडिया करीत आहे. या मीडियाशी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक जोडलेले आहेत. या माहिती पोहचविण्याच्या स्पर्धात्मक युगात डिजिटल मीडियानी आपली विश्वासार्हता निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनास दिलेल्या शुभेच्छा संदेशात केले.