लखनौ: लॉकडाऊन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी परत आणण्यासाठी ज्या रेल्वे गाड्या किंवा बसेस सोडल्या जात आहेत त्यासाठी मजुरांकडून जे भाडे वसुल केले जात आहे, त्यावर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही टीका केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी असे भाडे वसुल करणे हे दुर्देवी आहे ,असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारने या मजुरांचे भाडे देण्यास असमर्थता दर्शवली तर आम्ही बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निधी गोळा करून या मजुरांचे भाडे भरू असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. दरम्यान सर्वच राजकीय पक्षांकडून तिकीट आकारणीवर टीका होऊ लागल्यानंतर केंद्र सरकारने या तिकीटांचा 85 टक्के भार उचलण्याचा निर्णय घेतला असून उर्वीरत पंधरा टक्के संबंधित राज्यांकडून वसूल केले जाणार आहेत.