फलटण – जेष्ठ वद्य अष्टमीला हजारो वैष्णवासंगे माहेराच्या ओढीने पंढरीस निघालेला ज्ञानराजांचा सोहळा मजल दरमजल करीत सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामी सायंकाळी 6 वाजता पोहोचला. श्री क्षेत्र आळंदीहून पंढरीस निघालेला श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा उद्या शुक्रवार दि. 23 रोजी धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बरडजवळ माउलींच्या रथाचे सारथ्य करुन माउलींचे दर्शन घेतले.
टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरीनामाच्या जयघोषात अखंडपणे वाटचाल करीत वारकरी पंढरीच्या ओढीने निघाले आहेत. फलटणमध्ये वारकऱ्यांना आज पहाटे नगाऱ्याने जाग आली. विमानतळावर पहाटे पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते माउलींना पूजा व रूद्राभिषेक घालण्यात आला. यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर, तालुका दुध संघाचे माजी चेअरमन सुभाष शिंदे यांच्यासह
भाविक उपस्थित होते. येथे माउलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सकाळी सहा वाजता हा सोहळा बरड मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. माउलींच्या सातारा जिल्हा प्रवेशापासून ते सोलापूर जिल्हा सीमेपर्यंत पालखी सोहळ्याची सर्वस्वी जबाबदारी नाईक निंबाळकर घराण्याकडे असते. राणी लक्ष्मीबाई नाईक निंबाळकर यांना तो मान होता. आजही नाईक निंबाळकर घराण्याच्या वतीने या परंपरा जोपासल्या जातात. आळंदी ते पंढरपूर या वाटचालीत माउलीचा सोहळा फलटण मुक्कामी आल्यानंतर माउलींच्या पादुका या पूजेसाठी नाईक निंबाळकरांच्या श्री ज्ञानेश्वर मंदिरात आणल्या जातात. त्यानुसार सकाळी सहा वाजता सोहळा बरडकडे मार्गस्थ झाल्यानंतर नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या श्री ज्ञानेश्वर मंदिरासमोर थांबला. येथे माउलींची पूजा व दर्शन घेतल्यानंतर सोहळा पुढे मार्गस्थ झाला.
विडणी येथे सरपंच सागर अभंग यांनी सोहळ्याचे स्वागत केले. फलटणचा ओढा ओलांडून सोहळा पुढे आला. दुपारी साडेअकरा वाजता पिंपरद येथे पोहोचल्यानंतर सरपंच स्वाती भगत, उपसरपंच सागर बोराटे यांनी माउलीसह वारकऱ्यांचे स्वागत केले. सोहळ्याने येथे दुपारचे भोजन व विश्रांती घेतली. विडणी ते पिंपरद या वाटचालीत वारकऱ्यांच्या स्नानासाठी नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. तसेच पिंपरदचे प्रगतिशील बागायतदार बाळासाहेब घनवट, बाळासाहेब बोराटे व शामराव शिंदे यांनी स्नानासाठी शॉवरची सोय केली होती. वारीच्या वाटेवर महात्मा फुले युवक संघटना, पेठ इस्लामपूर (ता. वाळवा) येथील अतुल पाटील मित्र परिवाराने सुमारे 5000 वारकऱ्यांना झुणका भाकर देऊन अन्नदान सेवेचा लाभ घेतला.
दुपारच्या भोजनानंतर हा सोहळा दुपारी दीड वाजता निंबळक फाट्याकडे मार्गस्थ झाला. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण हा लपंडाव सुरू होता. मध्येच येणारी एखादी वाऱ्याची झुळुक वारकऱ्यांना सुखावून जात होती. निंबळक फाटा येथील विसाव्यानंतर सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता बरड येथील पालखी तळावर पोहोचला. समाजआरतीनंतर सोहळा येथे विसावला. सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन हा पालखी सोहळा उद्या शुक्रवार दि. 23 रोजी सकाळी धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत सुमारे दोन लाख वारकरी सहभागी झाले आहेत. आषाढी वारीपूर्वी पावसाने हजेरी न लावल्याने यावर्षी दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
उपमुख्यमंत्र्यांनी केले माउलींच्या रथाचे सारथ्य
पावसासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली प्रार्थना
जिल्हा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता बरडजवळ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाचे सारथ्य करुन दर्शन घेतले. सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील यांनी श्रीफळ व पुष्पहार देवून त्यांचा सन्मान केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीहल्ला झाला नाही याचा पुनरुच्चार केला. पण या प्रकरणाची आम्ही चौकशी करु असे सांगितले. आषाढी वारीबाबत वारकऱ्यांच्या अडीअडचणीचा नक्कीच विचार करु. त्यासाठी वारी झाल्यावर मुंबईत बैठक आयोजित करु, असे ते म्हणाले. राज्यात चांगला पाऊस पडावा व शेतकरी सुखी व्हावा, अशी प्रार्थना माऊली चरणी केल्याचे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदीनीही माऊलींचे दर्शन घेतले.