लखनौ – काशीतील ज्ञानवापी मशिद प्रकरणादरम्यान मथुरेतील कृष्णजन्मभूमी प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शाही इदगाह मशीद हटवण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या दाव्याला मुथरा न्यायालयाने परवानगी दिली आहे. यानंतर इदगाह मशीद हटवण्याच्या याचिकेवर न्यायालयीन कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. मथुरेतील शाही मशीद ही श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराला लागून आहे.
हिंदू संघटनांनी हा खटला दाखल केला आहे. याचिकेत श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाची 13.37 एकर जमीन भगवान कृष्णाच्या वतीने परत मिळावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या आदेशाने मंदिर पाडून केशवदेवाचा टिळा आणि जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन शाही ईदगाह मशीद बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
याचिकेत म्हटले आहे की, शाही इदगाह मशीद 1969-70 मध्ये कृष्णजन्मभूमीजवळ मुघल शासक औरंगजेबच्या आदेशानुसार बांधण्यात आली होती. रंजना अग्निहोत्री, हरिशंकर जैन आणि विष्णू जैन हे या याचिकेचे याचिकाकर्ते आहेत.
श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मशीद वादाच्या संदर्भात अधिवक्ता मुकेश खंडेलवाल म्हणाले, “वादीने खालच्या न्यायालयात दावा दाखल केला होता आणि फिर्यादीला दावा करण्याचा अधिकार नसल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्यानंतर मथुरा जिल्हा न्यायालयात पुनर्निरीक्षण दाखल करण्यात आले. न्यायालयाने आता कनिष्ठ न्यायालयाचा आदेश चुकीचा ठरवून स्थगिती दिली आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वकील हरिशंकर जैन आणि त्यांचा मुलगा विष्णू जैन यांनी मथुरा येथील दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात पहिला दावा दाखल केला होता, हे लक्षात घेण्यासारखे आहे. तथापि, 30 सप्टेंबर 2020 रोजी न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.
यानंतर याचिकाकर्त्यांनी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. ज्यावर 2020 पासून आतापर्यंत प्रदीर्घ चर्चा झाली. या याचिकेवर जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाने आज निकाल दिला आहे.