नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरून सध्या चॅंन्गलाच वाढ पेटला आहे. अशातच आता या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणताही आदेश उद्यापर्यंत (शुक्रवार) जारी करू नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयाला दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज (गुरुवारी) वाराणसी न्यायालयात सुनावणी झाली नाही. अशातच, शुक्रवारी देखील वाराणसी न्यायालयात याबाबत सुनावणी होणार असल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. सर्वोच्च न्यायालयाकडे हिंदू पक्षाने आज या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मुख्य वकील हरिशंकर जैन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सुनावणी उद्यापर्यंत (शुक्रवार) पुढे ढकलण्यात यावी, असे वकील विष्णू जैन यांनी सांगितले.
सुनावणीला विलंबाबा नको – मुस्लिम पक्षाची बाजू
मात्र, मुस्लिम पक्षाच्या वतीने हुजेफा अहमदी यांनी सांगितले की, या प्रकरणामुळे इतर ठिकाणीही असेच गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा परिस्थितीत या प्रकरणाच्या सुनावणीला विलंब होऊ नये, अशी आमची मागणी आहे. ‘आजही मशिदीची भिंत पाडण्यात यावी, असा अर्ज वाराणसी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. ट्रायल कोर्टाची कार्यवाही सुरू राहणार असल्याने, आम्हाला भीती आहे की ते या संदर्भात आदेश देऊ शकतात.’ असेही अहमदी यांनी सांगितले.
उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी होणार
अशा स्थितीत या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाच्या कामकाजाला शुक्रवारपर्यंत स्थगिती दिली. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाची सुनावणीही उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता उद्या सुप्रीम कोर्टात तीन वाजता सुनावणी होणार आहे. त्याच वेळी, या निर्णयानंतर हिंदू बाजूने उद्यापर्यंत ते ट्रायल कोर्टात पुढे जाणार नाहीत, असे सांगितले.
तथापि, मंगळवारी ज्ञानवापी मशीद प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या डीएम यांना कथित शिवलिंग सापडलेली जागा जतन करण्याचे आदेश दिले होते. मात्र असे करताना मुस्लिम समाजाच्या उपासना करण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे असे सांगितले होते.