मुंबई : कर्नाटक आणि महाराष्ट्राचे संपूर्ण लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता काबीज केली आहे. भाजपने तब्बल आठ वर्षानंतर महापालिकेवर निर्विवादपणे विजय मिळवला आहे. यावरून संजय राऊत यांनी राज्यातील भाजपवर कडाडून टीका केली.
बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला असून भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राऊत म्हणाले की, बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले अन् तुम्ही माणूस हरल्याबद्दल पेढे वाटता मराठी ? तुम्हाला लाज नाही वाटत ? राजकारण बाजूला ठेवा, जल्लोष करताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, अस राऊत म्हणाले.
भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीचा पूर्णपणे धुरळा उडवला आहे. या निवडणुकीत भाजपनं 35, काँग्रेसने 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एम आय एम १ असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे.