Marathi farmers : मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, असे अनेकदा बोलले जाते. पण मराठी माणसाने ठरवले तर तो काहीही करू शकतो थोड्या थोडक्या पैशात करोडो रुपयांचा उद्योग कसा निर्माण होऊ शकतो हे अनेक मराठी उद्योजकांनी दाखवून दिले आहे.
सोलापुरातील एका मराठी शेतकऱ्याने असेच उदाहरण सादर करून सर्वांनाच चकित केले आहे. मोठी गोष्ट म्हणजे या शेतकऱ्याने शेण विकून एक कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे. त्याने या बंगल्याला ‘गोधन निवास’ असे नाव दिले आहे.
महान उद्योजकांनी म्हटले आहे की व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप पैशांची गरज नाही, परंतु तुमच्याकडे चांगली कल्पना असली पाहिजे. या शेतकऱ्याने तेच केले. लोक कचरा टाकतात त्या शेणापासून करोडोंचा उद्योग उभा केला आहे. या शेतकऱ्याची यशोगाथा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
कोण आहे हा शेतकरी, त्याने व्यवसाय कसा सुरू केला?
प्रकाश नेमाडे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील इमदेवाडी येथे गावात राहतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर जमीन होती. मात्र पाण्याअभावी या जमिनीवर शेती करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांनी गायीचे दूध विकण्यास सुरुवात केली.
विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे फक्त 1 गाय होती. या गायीचे दूध ते गावात विकायचे. आज त्याच्याकडे दीडशेहून अधिक गायी आहेत. एक हुशार उद्योजक नेहमी आपला व्यवसाय कसा वाढवायचा याचा विचार करत असतो. प्रकाश नेमाडे यांनीही तेच केले. दुधासोबत शेण विकण्याचा व्यवसायही सुरू केला.
सेंद्रिय खत हे उत्पन्नाचे साधन बनवले
लोक आता शेतीत रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करू लागले आहेत. याशिवाय गोबर गॅस प्लांटही आहेत. या नवीन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात शेणखत लागते. आणि ही गरज प्रकाश नेमाडे पूर्ण करतात. त्याच्याकडे दीडशेहून अधिक गायी आहेत. तसे ते म्हातार्या गायींची मरेपर्यंत काळजी घेतात. याचा अर्थ असा की जेव्हा एखादी म्हतारी गाय दूध देणे सोडते त्यावेळी ते त्यांना सोडत नाहीत. त्यामुळे त्यांना भरपूर शेण मिळते. हे शेण विकून त्यांनी आणखी एक नवीन व्यवसाय सुरू केला.
करोडोंचा व्यवसाय निर्माण केला
प्रकाश नेमाडे सांगतात की, ‘एक काळ असा होता की त्यांच्याकडे 4 एकर कोरडवाहू जमीन होती. याच जमिनीवर त्यांनी करोडोंचा व्यवसाय उभा केला आहे. गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हा उपक्रम पाहण्यासाठी आज देशभरातून अनेक तरुण इमदेवाडी गावात येतात. प्रकाश नेमाडे स्वतः या तरुणांना भेटतात आणि त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरित करतात.’