– स्वप्निल श्रोत्री
स्वातंत्र्यानंतर भारताच्या चांगल्या वाईट दिवसांत ज्या कोणत्या राष्ट्रांनी मनापासून साथ दिली आहे त्या राष्ट्रांपैकी रशिया (पूर्वीचा यूएसएसआर) हे एक राष्ट्र होय.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन “भारत-रशिया 2+2 डायलॉग’च्या निमित्ताने भारत भेटीसाठी आले होते. पुतीन यांचा हा भारतदौरा अत्यंत छोटा म्हणजे चोवीस तासांपेक्षा कमी वेळेचा होता; त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू झाल्याचे दिसून आले.
काही अभ्यासकांच्या मतानुसार, भारत-रशिया संबंध हे आता पूर्वीसारखे राहिले नसल्यामुळे पुतीन चोवीस तासांपेक्षा कमी वेळासाठी भारतात आले होते; तर काही अभ्यासक किंवा तज्ज्ञ या मताच्या विरोधात होते. दोन्ही बाजूंकडे वेगवेगळ्या प्रकारचे दावे आणि प्रतिदावे असले तरी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारतदौरा हा अनेक अर्थाने भारतासाठी आशादायक होता. चोवीस तासांपेक्षा कमी वेळासाठी रशियाचे अध्यक्ष भारतात आले या एका कारणासाठी भारत-रशिया मैत्री संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.
आपण येथे एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की, सध्या करोना महामारीचा काळ आहे. वेगवेगळ्या देशात करोनाचे नवनवीन व्हेरिएंट जन्माला येत आहेत. ओमायक्रॉन नावाच्या व्हेरिएंटने संपूर्ण जगात धुमाकूळ माजविला असताना एखाद्या राष्ट्राचा प्रमुख दुसऱ्या अशा राष्ट्रांत जातो जेथे करोना बाधितांची आणि बळींची संख्या सर्वाधिक आहे; ही काही सामान्य गोष्ट नाही. रशिया भारताचा सुरुवातीपासूनच पारंपरिक मित्र म्हणून राहिला असून संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या सुरक्षा परिषदेत भारताची ढाल बनून रशियाने भारताला सतत सहाय्य केले आहे.
सन 1947 ला भारत स्वतंत्र झाला, तेव्हा जग हे दोन गटांत विभागले होते. पहिला गट हा अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांचा होता, तर दुसरा गट यूएसएसआर व त्यांच्या मित्र राष्ट्रांचा होता; परंतु स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व तत्कालीन परराष्ट्रमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला वरीलपैकी कोणत्याही गटांत सामील न करता स्वतंत्र राहात अलिप्तवादी (नाम) चळवळ उभी केली, तर पाकिस्तान व चीन ही भारताची शेजारील राष्ट्रे अमेरिकेच्या गोटात शिरली.
भारत जरी अलिप्तवादी चळवळीचे नेतृत्व करीत असला तरी भारताची यूएसएसआर बरोबरील मैत्री मात्र घनिष्ट होती. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने अमेरिकेमार्फत जेव्हा जेव्हा भारताविरोधात प्रस्ताव आणले तेव्हा तेव्हा यूएसएसआरने आपल्या नकाराधिकाराचा (व्हेटो) वापर करीत ते खोडून काढले. परिणामी, यूएसएसआर बरोबर भारताचे फक्त राजनैतिकच नाही तर भावनिक संबंध तयार झाले.
पुढे जसे दिवस बदलत गेले तशी भारतात हळूहळू आर्थिक सुबत्ता आली. भारत मोठ्या प्रमाणावर यूएसएसआरकडून शस्त्रे आयात करू लागला. भारताच्या शस्त्रासे खरेदीचा आर्थिक फायदा यूएसएसआरला झाला. सुरुवातीला शस्त्र खरेदी सुरू झालेले भारत-यूएसएसआर व्यापारीसंबंध नंतर शिक्षण, आरोग्य व इतर क्षेत्रांत प्रस्थापित झाले. पुढे सन 1991 मध्ये यूएसएसआरच्या विभाजनानंतर यूएसएसआरची जागा रशियाने घेतली.
पूर्वी यूएसएसआरचा भाग असलेली युक्रेन, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान यांसारखी राष्ट्रे अमेरिकेच्या गोटात शिरली. परंतु, भारताने रशियासोबत असलेली आपली मैत्री कायम ठेवली.
सन 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी अमेरिका ब्रिटन व चीन पाकिस्तानच्या बाजूने भारताविरोधात युद्धाची धमकी दिल्यामुळे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यूएसएसआर बरोबर मैत्रीचा करार केला. मैत्रीच्या करारामुळे जर अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांपैकी कोणीही भारताविरोधात युद्ध पुकारले तर यूएसएसआर त्या राष्ट्राविरोधी युद्ध पुकारेल अशी घोषणा यूएसएसआरकडून करण्यात आली.
भारताच्या मदतीसाठी यूएसएसआरने आपल्या अग्नेय (पूर्व-दक्षिण) दिशेला असलेल्या व्लादीवोस्तोक शहरातून एक अण्वस्त्रधारी लढाऊ जहाजांचा ताफा बंगालच्या उपसागरात भारतीय सीमेनजीक पाठविला. परिणामी, इच्छा असूनही अमेरिका, ब्रिटन किंवा चीन यांच्यापैकी कोणालाही पाकिस्तानच्या बाजूने युद्धात भाग घेता आला नाही आणि भारताने एकतर्फी हे युद्ध जिंकून जगाच्या नकाशावर “बांगलादेश’ नावाचे एक नवीन राष्ट्र निर्माण केले.
व्लादीवोस्तोक शहरातून आलेल्या जहाजांमुळेच भारताने युद्ध जिंकले अशी तेव्हा अनेक भारतीयांची भावना होती. त्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत रशिया व त्यांच्या व्लादीवोस्तोक शहराबद्दल भारतीयांच्या मनात विशेष आदर व प्रेम आहे. जागतिक राजकारण हे सध्या अनिश्चितेने भरले आहे. पूर्वी ज्याप्रमाणे अमेरिकेची जागतिक राजकारणावर पकड होती ती आता राहिलेली नाही. यूएसएसआरच्या विघटनानंतर रशिया पूर्वी जितका ताकदवान होता तितका आता राहिला नाही. अमेरिका आणि रशिया हे एकमेकांचे पारंपरिक शत्रू आणि स्पर्धक राहिले आहेत;
त्यामुळे ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज अमेरिका आणि रशिया या दोन पारंपरिक स्पर्धकांमध्ये चीन नावाचा नवीन स्पर्धक आला आहे; जो अमेरिकेला हटवून जागतिक राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या उक्तीप्रमाणे चीनसोबत रशियाची असलेली मैत्री मागील काही वर्षांत वाढली असली, तरी अमेरिकेला जागतिक राजकारणात चीनने पराभूत केल्यानंतर एकेकाळी जागतिक महासत्ता असलेल्या रशियाला “चीनचे हस्तक राष्ट्र’ म्हणून काम करणे आवडेल का?
चीन-रशिया मैत्री ही विशिष्ट उद्देशासाठी झालेली आहे. ज्या दिवशी या दोघांचा उद्देश सफल होईल त्या दिवसापासून ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणून समोर येतील याविषयी खात्री बाळगण्यास हरकत नाही. उलट भारत-रशिया मैत्री ही कोणत्या उद्देशासाठी नव्हे तर नैसर्गिक भावनेतून तयार झाली आहे. त्यामुळे कितीही काही झाले तरी एका ठराविक मर्यादेनंतर ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांचे मित्र म्हणूनच समोर येतील.