बहुसंख्य भारतीय महिलांना हक्कांची जाणीवच नाही!
लखनौ, दि. 15 – खेड्यापाड्यात व डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या बहुसंख्य महिलांना अजून त्यांच्या हक्कांविषयी, कर्तव्यांविषयी काहीही कल्पना नाही. त्यांना याविषयी जाणीव करून दिली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी येथे महिला कॉंग्रेस संमेलनात भाषण करताना केले.
अमेरिका-भारत धान्यपुरवठा करार
नवी दिल्ली- अमेरिकेचे भारतातील मावळते वकील मोइनीहान निरोपावेळी म्हणाले, पुढील आठवड्यात भारत व अमेरिका यांचा धान्य पुरवठा करार वॉशिंग्टन येथे होईल. त्या अन्वये अमेरिका भारताला 3 लाख टन अन्नधान्ये पुरवील. हे धान्याचे कर्ज 40 वर्षांत देवघेवीच्या चलनात फेडायचे आहे.
काळजी करू नका; देशात भरपूर धान्य
लखनौ – अन्नधान्य परिस्थितीबाबत काहीही काळजी करण्यासारखे नाही, अशी ग्वाही पंतप्रधान इंदिरा गांधींनी दिली. त्या म्हणाल्या, देशात निसर्गाच्या लहरीपणामुळे पिके जरी थोडीफार नष्ट झाली असली तरी कोणत्याही संकटाला तोंड देण्याएवढा धान्याचा साठा आपल्याजवळ आहे.
श्रीमंत देश विपुल लोकसंख्या असलेल्या देशांना नेहमी संतती नियमाचा उपदेश करतात परंतु स्वतःच्या देशातील अन्नधान्याचा वापर मात्र मर्यादित ठेवीत नाहीत.
सुएझच्या आखातात तेलाचे प्रचंड साठे
कैरो – सुएझच्या आखातात रमदान भागात तेलाचे प्रचंड साठे सापडल्याचे वृत्त आहे.