छत्रपती संभाजीनगर – “आरक्षण मिळाले नाही, तर पुढील दिशा आम्ही 22 तारखेला जाहीर करू. मात्र, आमचे पुढचे आंदोलन सरकारला झेपणार पण नाही आणि पेलणार पण नाही’, असा सज्जड इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला.
आंतरवाली सराटी येथे झालेल्या जाहीर सभेनंतर मनोज जरांगे पाटील हे एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावे यासाठी सरकारने 30 दिवसांचा अवधी मागितला होता. त्यानुसार सरकारला 30 नाही तर 40 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. यातील 30 दिवस आता संपले असून आणखी 10 दिवस सरकारकडे (Shinde Fadanvis Sarkar) आहे. या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
मी माझ्या समाजाला विचारल्याशिवाय काहीही करत नाही. मी समाजाला विश्वासात घेतो. तसेच समाजाने दिलेल्या शब्दाच्या पुढे जात नाही. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी देखील मी आधी समाजाशी चर्चा करणार आहे. यानंतर समाजाने घेतलेल्या निर्णयानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. त्यासाठी 22 तारखेला आम्ही सर्व समाजाची एक बैठक आयोजित केली आहे, त्या बैठकीनंतर निर्णय सर्वांना सांगितला जाईल, असे देखील मनोज जरांगे – पाटील यांनी यावेळी सांगितले.
जेवणात माती कालवू नका
मराठा (Maratha) समाजावर प्रस्थापितांमुळेच ही वेळ आली आहे. त्यामुळे आता कोणीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मध्ये येऊ नका, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला. मराठा समाजातील मुलांच्या जेवणात माती कालवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे देखील ते म्हणाले. आरक्षणाला विरोध करणारा ओबीसी समाज, कंत्राटी पद्धतीने होणारी भरती, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी होत असलेले आरोप, अशा सर्व प्रश्नांचा यावेळी त्यांनी सडकून समाचार घेतला.