Manoj Jarange Patil – छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे यांनी आपण तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा (maharashtra Tour) करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे देखील सांगितलं आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “मी कुटुंबियांसोबत बोललो नाही, कदाचित माझं कुटुंब ही दिवाळी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. मात्र दोन दिवसांच्या आरामानंतर लागलीच महाराष्ट्र राज्याचा दौरा सुरु करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटलं आहे.
15 नोव्हेंबर पासून राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात गावागावात सभा घेणार आहे. एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे.
सरकारवर दबावासाठी दौरा नाही, तर लोकांच्या भेटीगाठीसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून अनेक मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागली आहेत. सरकारला एकच विनंती आहे की, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या.
मुख्यमंत्री, गृहमंत्री, एसपी सगळ्यांना विनंती आहे, लवकरात लवकर कार्यवाही करा, नाहीतर पुन्हा म्हणू नका मराठे आले. ही धमकी समजा वा अजून काही समजा, पण सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना सांगातोय की गोरगरीब मराठ्यांना अत्याचार करू नका, अन्यथा मराठा समाजाशी गाठ आहे, असा इशाराच मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.