करोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याने प्रशासनाचा निर्णय
मंचर- मंचर शहरात करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळू लागले आहेत. खबरदारी म्हणून प्रशासन आणि व्यापारी यांनी मंचर शहर बुधवार (दि. 26) पासून सायंकाळी 5 नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती मंचर शहर महाव्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योजक अजय घुले यांनी दिली.
मंचर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेला बैठकीसाठी तहसीलदार रमा जोशी, सहायक गटविकास अधिकारी जयराम लहामटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकळे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कृष्णकुमार खराडे, ग्राम विकास अधिकारी सचिन उंडे, खत आणि व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महेश मोरे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, उद्योजक सचिन काजळे, सोमनाथ खुडे, भरत मेंगडे, आशिष पुंगलिया, प्रशांत थोरात, बॅंकेचे ज्येष्ठ संचालक गणपतराव कोकणे यांच्यासह विविध व्यावसायिक, प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यानुसार सायंकाळी पाचनंतर शहरातील दवाखाने, मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. रस्त्यावर सायंकाळी 5 नंतर बसणाऱ्या भाजीपाला विक्रीसाठी ही निर्बंध घालण्यात आले आहे.
या नियमांचे पालन न झाल्यास संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिला आहे. प्रशासनाला सर्व दुकानदार आणि ग्रामस्थांनी सहकार्य करून करोना मुक्त मंचर शहर करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार रमा जोशी यांनी केले आहे. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आणि मास्क वापरणे बंधनकारक असून या नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्याचा बडगा उचलावा लागेल असा इशाराही पोलीस अधिकारी खराडे यांनी दिला आहे.