कोलकाता – पश्चिम बंगाल मधील ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा येत्या बुधवारी विस्तार केला जाणार असून त्या मंत्रिमंडळात चार ते पाच नवीन चेहेऱ्यांचा समावेश केला जाईल असे संकेत आहेत. या मंत्रिमंडळातील एक मंत्री पार्थ चॅटर्जी यांना त्यांच्यावर शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळाची त्यांच्याकडून व्यापक फेररचना केली जाण्याची शक्यता आहे. बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार करण्याची घोषणा स्वत ममता बॅनर्जी यांनी केली आहे. चॅटर्जी प्रकरणानंतर ममता संपुर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून नवीन मंत्रिमंडळ तयार करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्याचा ममतांनी इन्कार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की संपुर्ण मंत्रिमंडळ काढून टाकण्याची गरज नाही.
त्याऐवजी काही प्रमाणात फेरबदल करून चार ते पाच नवीन मंत्र्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाईल. त्याखेरीज बंगाल मध्ये सात नवीन जिल्हे तयार करण्याची घोषणाहीं त्यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या आता 23 वरून 30 इतकी होणार आहे.