नगर – मुख्यमंत्री निधीतून साडेतीन कोटी रुपये मंजूर झालेल्या तपोवन रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आले आहे. महापालिकेतील सत्ताधारी नेते व ठेकेदार हात मिळवणी करून जनतेचा पैशाची उधळपट्टी करीत आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता ठेकेदाराने पुन्हा नव्याने करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जर रस्त्याचे काम पुन्हा सुरु केले नाही तर शिवसेना मोठे जनआंदोलन उभारेल, असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला.
तपोवन रस्त्याच्या कामाची पाहणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज सकाळी करून रस्त्याच्या पुर्नकामाच्या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी व ठेकेदाराचा निषेध करण्यात आला. तपोवन रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराचा व निकृष्ट कामाचा निषेधाच्या मजकूराचा फलक तपोवन रस्त्यावर शिवसेनेच्यावतीने लावण्यात आला आहे. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, गिरिश जाधव, नगरसेवक योगीराज गाडे, उपशहरप्रमुख डॉ.चंद्रकांत बारस्कर, रवी वाकळे, आकाश कातोरे, अभिषेक भोसले, महेश गलांडे, अनिकेत कराळे, सनी दळवी, उमेश भांबरकर आदि उपस्थित होते.
शिवसेनेच्या प्रयत्नातून तपोवन रस्त्यासाठी साडेतीन कोटींचा निधी मिळाला. पण नेहमीप्रमाणे लोकांची दिशाभूल करुन त्यांनी श्रेय लाटले. पहिल्याच पावसात उघडे झाले आहे. पाऊस आला छोटा.. दावा ठरला खोटा. त्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडल्याने जबाबदारी ढकलण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा चालू आहे, असा आरोप कळमकर यांनी केला.