वाई – वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांचे आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट साताऱ्याचे प्रमुख नेते मकरंद पाटील यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा बारामती येथे गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी या दोघांमध्ये सुमारे पाऊण तास विविध विषयांवर चर्चा झाली.
या भेटीतील चर्चेने मात्र साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.किसन वीर साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या गाळप हंगाम शुभारंभाच्या भाषणात आम्ही शरद पवारांशी निष्ठा ठेवून आहोतच. मी घेतलेली भूमिका माझ्या मतदार संघातील काही सहकाऱ्यांना आवडली नाही परंतु साखर कारखाना आणि मोठा मतदार संघाच्या विकास कामांसाठी निर्णय घेतला, असे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले होते.
त्याचवेळी आमदार पाटील यांनी राजकीय तडजोडी आणि शरद पवार यांच्याशी असणाऱ्या निष्ठेबाबत भाष्य करून आपली भूमिका स्पष्ट केली होती. तरीही आ. पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार निष्ठावंत वेगवेगळी चर्चा करत होते. त्यामुळे या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. किसन वीर भुईंज व खंडाळा कारखान्यांचे गाळप सुरु झाले का, काही अडचणी आहेत का, याची माहिती मकरंद पाटील यांच्याकडून या भेटीत शरद पवार यांनी आवर्जून घेतली.
मराठा आरक्षणावर ही साताऱ्यातील नेमक्या स्थितीची माहिती श्री. पवार यांनी घेतली. दरवर्षी दिवाळी पाडव्यादिवशी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते येत असतात. आमदार मकरंद पाटील दरवर्षी तिथे हजेरी लावत असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतरही बहुतांश आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, शामराव गाडवे, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते.