शेवगाव – पर्यावरण वाचवून निसर्गाचे संवर्धन व्हावे,वातावरण स्वच्छ होऊन रोगराईला आळा बसावा,सर्व जण निरोगी व सदृढ बनावेत आणि सर्वात महत्वाचे स्वच्छता ही आपली संस्कृती बनावी म्हणून राज्य शासनातफे सुरू करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियानाचा’ शेवगाव शहरात पुरता बोजवराच उडाला आहे. या अभियान उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत व नगरपालिकांना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्यात येते. मात्र शेवगाव नगरपालिकेकडून केवळ स्वच्छतेच्या भिंती रंगविण्यापलिकेकडे काहीच करीत नसल्याने शहर अस्वच्छतेचे आगार झाले आहे.
हे अभियान ज्यांच्यासाठी आहे, तो केंद्रबिंदू असलेल्या नागरिकांनी ते मनावर घ्यायला हवे. अन्यथा त्यासाठी होणारा लाखो रुपयाचा खर्च वाया जाणार असून कोट्यवधीची पारितोषिके केवळ सन्मानाची प्रतीके ठरणार आहेत. अर्थात नागरिकांना जबाबदारी व कर्तव्याची जाणिव करू देणे आवश्यक आहे. त्यासाठी शेवगाव पालिकेकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. तालुक्यात हे अभियान अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आले असून गटविकास अधिकारी महेश डोके, आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रोत्साहनामुळे वाघोली ग्रामपंचायतीला युवा कार्यकर्ते उमेश भालसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्यावर्षी दीड कोटी रुपयाचे प्रथम पारितोषिक मिळाले.
शेवगाव नगरपालिकेचे देखील सर्वेक्षणास सामोरे जात आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ‘स्वच्छ सर्वेक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत’ असे भित्ती फलक गावात ठिकठिकाणी झळकू लागले आहे. मात्र प्रत्यक्षात स्वच्छतेचे काम काही दिसत नाही. शेवगाव नगरपरिषदेने विविध उद्घोषाची, पानाफुलाची, वृक्षवेलींची आणि प्राण्यांची रंगीबेरंगी, आकर्षक व नयनरम्य असे सुमारे सहा हजारावर भित्ती फलक रंगविले आहेत. मात्र स्वच्छता मोहित राबविण्यात नगरपरिषद कमी पडले आहे. अर्थात नगारिकांचा सहभाग वाढविला जात नसल्याने शहर स्वच्छता कागदावर दिसत आहे.
नागरिकांनी ओला सुका कचरा वेगळा करून नगरपरिषदेच्या घंटा गाडीत टाकायला हवा, मात्र तसे होतेच असे नाही. कचरा कोठेही रस्त्यावर टाकला जातो.अनेकदा नगरपरिषदेच्या स्वच्छता सर्वेक्षणानिमित्त रंगविलेल्या भित्ती फलका जवळच कचरा आढळतो. “स्वच्छ सर्वेक्षणास आम्ही सज्ज आहोत’ अशा एखाद्या भित्ती फलका खाली कचऱ्याचा उकिरडा साचलाय. त्यात खाद्य शोधणारी मोकाट जनावरे, डुकरे तुटून पडलेली आढळली तर सर्वेक्षणाची वाट लागणार.
शेवगावची मुख्यबाजार पेठ तर मुळातच अरुंद त्यात दोन्ही बाजूचे व्यावसायिक आपापल्या दुकानाची झाडलोट करून रस्त्याच्या मध्यावर लोटून देतांना आढळतात. थोड्याच वेळात तो कचरा इतस्तः पसरतो.याचेही भान त्यांना नसते.पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. ती वरचे वर व्हायला हवी. येथील नेवासे, पाथर्डी व मिरी रस्त्याच्या कडेला असलेल्या उघडया गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचून त्या अशोभनीय प्रदर्शन करत आहेत. त्याकडे सर्वांचेच दूर्लक्ष झाले आहे.
अभियानाद्वारे वातावरणातील बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांना जागरूक करून त्यांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी सजग करण्यात येत आहे. त्यासाठी माझी वसुंधरा अभियान शासनाचे वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर 2020 पासून राबविण्यात येत आहे. नागरिकांनी त्यास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले.