पुणे, दि. 12 – महाराष्ट्राच्या तुलनेत देशातील अन्य राज्यात जलजीवन मिशनची कामे चांगली झाली आहेत. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कामांना ब्रेक लागला, असा आरोप केंद्रीय अन्न प्रक्रिया व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली. जलजीवन मिशन अंतर्गत जनतेपर्यंत पाणी पोहचू दिले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पटेल यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे आदी उपस्थित होते. जगातील अन्य देशांचे तुलनेत भारतात इंधन स्वस्त आहे, असा दावाही करीत पटेल म्हणाले, देशात 2019 मध्ये जलजीवन मिशनला सुरुवात झाली. मात्र देशात तेलंगणा, हरियाणा आणि गोवा राज्याने महाराष्ट्रापेक्षा चांगले काम करून जल जीवनमध्ये आघाडी घेतली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चांगले काम झालेले नाही. केंद्राने कोणतीही भेदभाव नीती न वापरता सर्व राज्यांना जल जीवन मिशनसाठी निधी दिला. योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. परंतु महाविकास आघाडी सरकारला निधी देऊनही कामाला गती दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्राला पाण्यापासून वंचित ठेवण्यास तत्कालीन सरकार जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.
शरद पवार यांच्यावर टीका
दोन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. मला विकास दिसला नाही, मात्र नागरिकांमध्ये भीती दिसली, असेही पटेल म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, राजकारणातील त्यांची उंची बघता मी त्यांना “साहेब’च म्हणेल, परंतु त्यांनी एकही स्वत: सहकारी संस्था उभी केल्याचे माझ्या माहितीत नसल्याचे पटेल यांनी सांगितले.