मुंबई – महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला. महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहे. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
सरकारने बांधावर जाऊन 25 हजारांच्या घोषणा केल्या, 50 हजारांच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. विविध आपत्तीत मदतच केली नाही. केली तरी तोकडी केली. त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचे सरकार बरे होते. हे सरकार मदत करत नाही, त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे, असे फडणवीस म्हणाले.
याच सरकारने मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का? असा सवाल करतानाच मावळमध्ये गोळीबार झाला तो जालियनवाला बाग होता, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
आजचा बंद संवेदना दाखवणारा नाही तर राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही. प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस, जीएसटी प्रशासनाचा वापर करून लोकांना बंद करायला भाग पाडलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळाच्या काळात दौरे करण्यापेक्षा केंद्र सरकारकडून होत असलेल्या दुजाभावबाबत बोलावे. आताही राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. त्याला नाममात्र पैसे देण्याचे केंद्राने मान्य केले आहे. राज्य सरकारवर आरोप करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी केंद्राकडे जाऊन राज्याच्या सरकारला आणि राज्यातला शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत होईल यासाठी काम करायला हवे.
– नाना पटोले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच, मविआने पुकारलेल्या “महाराष्ट्र बंद’ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?
– नवाब मलिक, राष्ट्रवादीचे नेते
देशातील शेतकऱ्यांची लढाई महाराष्ट्र लढत आहे. दीड वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन करताना 400 पेक्षा अधिक शेतकरी मरण पावले आहेत. हरियाणात भाजपच्या राज्यात काही शेतकऱ्यांचे डोके फोडले आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडून मारले आहे. शेतकरी आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. म्हणून महाराष्ट्राने बंद पुकारला आहे. पण बंदला पाठिंबा नाही, बंद मोडून काढू अशी भाषा करणारे मूर्ख आहेत.
– संजय राऊत, शिवसेना नेते