पुणे – थोर समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना त्यांच्या अतूलनीय सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांनी केली. अहिल्याश्रम नाना पेठ येथील डीसीएम संस्थेच्या वतीने महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली. महर्षि शिंदे यांच्या क्वार्टर गेट चौकातील पुतळ्याला आमदार रवींद्र धंगेकर, अध्यक्ष डी.टी रजपूत, विशाल शेवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, संस्था प्रतिनिधी काजलताई शेवाळे, वर्षाताई पाटील, मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले, सुनीता भोसरेकर, धर्मेंद्र देशमुख, यशवंत बेंद्रे, सहशिक्षक चासकर, जगताप, इभाड, कटारिया, फिरोदिया, काळे मॅडम, प्राचार्य जगन्नाथ म्हस्के सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी मनोगतात शेवाळे म्हणाले, “महर्षि शिंदे यांनी सर्व समाजासाठी काम केले. डीसीएम अर्थात डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्थेची स्थापना करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल सरकारने घ्यावी.
यासाठीचा ठराव संस्थेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली येथे समक्ष भेटून देण्यात येणार आहे.’
यावेळी डी. टी. रजपूत यांनी अध्यक्षीय मनोगतात महर्षि विठ्ठल शिंदे यांच्या कार्याची माहिती दिली. पुढील नवीन शैक्षणिक वर्षात मेडिकल, इंजिनिअरिंग, विधी, बी.एड. महाविद्यालये सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.