मुंबई – आधी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची महायुती झाली. त्यानंतर आता या महायुतीत राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट सामील झाला आहे. त्यानंतर आता सर्वच ठिकाणी त्यांना तडजोड करावी लागत आहे. अशातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भिवंडीत महाविजय 2024चा संकल्प जाहीर केला. यावेळी बावनकुळे यांनी सांगितले की, लोकसभेला मोदींचा विजय पक्का असून देशात 350 प्लस आणि राज्यात 45 प्लस जागा जिंकू. तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप 152 प्लस झालेला आपणाला पाहायला मिळेल. तर महायुती म्हणून 220 प्लस विधानसभेच्या जागा निवडून येतील असा संकल्प त्यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केल्या प्रमाणे भाजपचा स्ट्राईक रेट 152 प्लस आणि महायुतीचा 220 प्लस असा असेल तर या आकड्यामुळे आता शिंदे गट आणि अजित पवार गटाची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण विधानसभेत आमदारांचे संख्याबळ 288 असून त्यातील एकट्या भाजपने 152 जागा लढविण्याचे ठरल्यावर शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला केवळ 68 जागा येणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी आमदारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 80 ते 85 जागा लढविण्याचा दावा केला होता. तर, अजित पवार यांनी बांद्रा येथील एमआयटी येथे कार्यकर्त्याना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस 90 जागा लढविण्याचा दावा केला होता. मात्र, भाजपने विधानसभेच्या किती जागा लढणार याचे आकडेच जाहीर केल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटाची पंचाईत झाली आहे. तर शिंदे आणि पवार या दोन्ही नेत्यांनी 80 आणि 90 जागा लढविल्यास भाजपला केवळ 118 जागा मिळण्याची शक्यता आहे. आता हा विधानसभा जागावाटपाचा तिढा कसा सोडवला जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.