पुणे – महाराष्ट्राचा माजी डावखूरा फलंदाज व माजी कर्णधार पुणेकर धीरज जाधव याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रणजी स्पर्धेचे 100 पेक्षा जास्त सामने खेळलेला, तसेच बीसीसीआयच्या सामन्यांमध्ये रणजी, एकदिवसीय व टी 20 सामन्यांमध्ये तब्बल 9000 पेक्षा जास्त धावा त्याने केल्या आहेत. त्यात त्याने एकूण 26 शतके, 40 अर्धशतके फटकावली आहेत.
2003-04 सालच्या मोसमात 1000 पेक्षा जास्त धावा करून त्याने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली झिंम्बाम्बे व ऑस्ट्रेलिया विरूध्द भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले. धीरजने महाराष्ट्राच्या रणजी संघाचे कर्णधारपदही भूषविले होते, तसेच आसाम व गोवा संघाचे व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आपली कारकिर्द घडवली. त्यानंतर पुणे वॉरियर्ससाठी 2013 सालच्या मौसमात त्याची निवड झाली.
धीरजने आपल्या कारकिर्दीमध्ये सहकार्य मिळालेल्या आपल्या सहकार्यांचे तसेच सर्व बीसीसीआय पदाधिकारी आणि विशेषकरून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे आभार मानले आहेत. 16 वर्षाच्या कारकिर्दीत सर्व प्रशिक्षक तसेच कुटूंबातील सर्व सदस्यांचे विशेष करून आईचे मनापासून आभार त्याने व्यक्त केले.
वाढदिवसादिवशीच निवृत्तीचा निर्णय हा माझ्या आयुष्यातील न विसरणारा क्षण आहे. माझ्या आयुष्यात सर्व जे काही शिकलो ते या खेळामूळे. खेळाने खूप मला काही दिले. अनेक चढ-उतार पाहिले परंतू क्रिकेटच्या दुसऱ्या इनिंगमध्ये माझा खेळाचा अनुभव मी क्रिकेटपटूंसाठी देणार असल्याचे धीरज जाधव याने यावेळी सांगितले.
मेघालय रणजी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्याची सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे.