मुंबई – लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारकडून 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शिवसेना या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे अशी ग्वाही या पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
देशाची पूर्ण परिस्थिती आपल्याला माहिती आहे. लखीमपूर भागात जे घडले ते सरळसरळ या देशाच्या संविधानाची हत्या आहे. अन्नदाता शेतकऱ्याला संपवण्याचे षडयंत्र आहे. या सरकारने मनात आणले तर राज्या-राज्यात लखीमपूर सारख्या घटना घडू शकतात अशी टीका करतानाच केंद्र सरकार आणि संबंधित पक्षाच्या नसानसात अमानुषता आणि निर्घृणता भरली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंदबाबत घोषणा केली होती. मात्र, या बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बालासाहेब थोरात हे चिपी विमानतळाच्या कार्याक्रमात होते. त्यांनी सिंधुदुर्गातून फोन करुन आम्हाला एकत्र पत्रकार परिषद घ्यायला सांगितली. लखीमपूर येथे जो प्रकार शेतकऱ्यांबाबत घडला त्याचा निषेध करण्यासाठी बंद पुकारला आहे. त्याबंदला महाविकास आघाडीचे तीनही घटकपक्ष सक्रीय पाठींबा देत आहेत, असे संजय राऊत यांनी जाहीर केले.
राहुल गांधी यांच्यासोबतही याबाबत चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठोपाठ इतर राज्यांनीही पुढाघार घ्यावा असे म्हटले. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जिथे आहोत तिथे पाठींबा द्यावा. त्याशिवाय या निर्घृण कृतीला आळा बसणार नाही. जनता झोपलेली नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांबरोबर शिवसेनाही पूर्ण ताकदीने या बंदात उतरले. पण ताकद लावण्याची गरज नाही. लोकं स्वयंस्फूर्तीने बंद पाळतील, असा घणाघातही राऊत यांनी यावेळी केलाय.
भाजप शेतकऱ्यांची हत्या करणारा पक्ष – मलिक
नवाब मलिक यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चढवली. त्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. इतका नरसंहार झाल्यानंतरही गुन्हा दाखल व्हायला उशीर झाला. पवारसाहेब जसे म्हणाले जालियनवाला बागसारखं हत्याकांड आहे. भाजप हे शेतकऱ्यांच्या शेतमालाची लूट करणारा पक्ष आहे. शेतकऱ्यांची हत्या करणारा हा पक्ष आहे. त्यांना आळा घालणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बैठक झाली. त्यात ठरलं की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असंही नवाब मलिक म्हणाले.