पाटणा :- गुजरात हे स्वत:चे गृहराज्य असूनही ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवतात, त्याचप्रमाणे आता बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार आगामी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातून लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
त्यामुळे उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे.
एकीकडे भाजप या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहे; तर दुसरीकडे विरोधकही तयारीला लागले आहेत. मोदी सरकारच्या विरोधात सर्व पक्षांना एकत्र आणणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आंबेडकरनगर, फुलपूर अथवा अन्य एखाद्या ठिकाणाहून निवडणूक लढवू शकतात, असे जेडीयूचे उत्तर प्रदेश संयोजक सत्येंद्र पटेल यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या राज्य युनिटने नितीश कुमार यांना यूपीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे.
पटेल यांनी सांगितले की, जेडीयूला आघाडीत काही जागा मिळाल्या तर पक्ष निवडणूक लढवण्यास तयार आहे. त्यादृष्टीने राज्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे काम सुरू झाले आहे.
जिल्ह्यापासून बूथपर्यंत संघटनेची पुनर्रचना केली जात आहे. लवकरच प्रदेश पदाधिकारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांची भेट घेऊन निवडणुकीच्या तयारीची माहिती देणार आहेत. यासोबतच त्यांना यूपीमधून पुन्हा निवडणूक लढवण्याचे निमंत्रणही दिले जाणार आहे.