Chhagan Bhujbal On Pankja Munde – पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रीत करावे, त्या तेथून निवडून येणे महत्त्वाचे असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये उमेदवार नाही ही अडचण नाही तर जास्त उमेदवार आहेत, ही अडचण असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर वंजारी समाजाचेही अनेक उमेदवार आमच्याकडे असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाली नाही, याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही. कारण त्यांची देखील अडचण होती. हा त्यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यांचा विद्यमान खासदार आहे. त्यामुळे त्यांची अडचण होती. त्यामुळे त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. नाशिकप्रमाणेच ओबीसी आणि इतर समाज शिरूर मध्ये देखील आहे.
त्यामुळे तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढणार का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मला विचारला होता. त्यांचे हे विचारणे सहाजिक होते. त्यांचा हेतू चांगला होता. मात्र, मी नाशिक लोकसभा मतदारसंघातच राहतो आणि हा माझा मतदारसंघ आहे.
निवडणुकीला उभे राहायचे म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहणारा नाही. त्यामुळे मी त्यांना नाकार दिला. मी काही नाशिकसाठीही तिकीट मागितलेले नव्हते. त्यामुळे मी कुठे जाऊन उभे राहण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. त्यामुळे मी त्यांना नकार दिला, असे देखील छगन भुजबळ यांना म्हटले आहे.
राज्यभरात ओबीसी समाज आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या रॅली दरम्यान अनेक ठिकाणी उभे राहावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, मी नाशिक मतदारसंघ सोडून कुठेही लढण्याचा प्रश्नच येत नाही. मी नाशिक ऐवजी शिरूर मधून लढण्यास तयार झालो असतो तर नाशिकचा तिढा सुटला असता, असे मुख्यमंत्र्यांचे प्रामाणिक मत होते.
त्यामुळेच शिंदे यांनी मला फोन करून शिरूर मधून लढण्यासाठी विचारणा केली होती, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले. मला नाशिक मधून उमेदवारी मिळाली असती तर निवडून आलो असतो, असा दावा देखील यावेळी छगन भुजबळ यांनी केला आहे.