Lok Sabha Election | आगामी लोकसभा निवडणुकीची थोड्याच वेळात घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग 543 लोकसभा मतदारसंघांसाठीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करणार आहे. त्यानुसार आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. । Lok Sabha Election
लोकसभा निवडणूकीच्या काळात सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. यंदा भाजपकडून 400 पार चा नारा दिला आहे.
भाजपने देखील तिसऱ्यांदा आम्हीच सत्तेत येऊ असा दावा केला आहे. दुसरीकडे, भाजपला पराभूत करु असा विश्वास विरोधकांनी व्यक्त केला आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी लोक मतदान करणार आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणूक जाहीर केल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये जसे सरकारसाठी नियम असतात, तसेच राजकीय पक्षांसाठीही प्रचारासंदर्भात अनेक नियम असतात.
संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाला पोलिसांची, प्रसंगी लष्कराची मदत घ्यावी लागते.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार प्रचारासाठीची नियमावली अशी आहे…
प्रचारासाठीचे नियम कोणते ? । Lok Sabha Election
१. कोणत्याही पक्ष किंवा उमेदवाराने धार्मिक किंवा भाषिक, जातीय आणि समुदायांमधील मतभेद वाढवणारा किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करणारी कोणतीही कृती करू नये. तसेच कोणत्याही स्वरुपात चिथावणीखोर भाषेचा वापर करु नये.
२. जेव्हा राजकीय पक्षांवर टीका केली जाते तेव्हा ती त्यांची धोरणे आणि कार्यक्रम, भूतकाळातील नोंदी आणि कार्यापुरती मर्यादित असते. पक्ष आणि उमेदवारांनी इतर पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक जीवनातील सर्व पैलूंवर टीका करणे टाळावे.
या पैलूंचा कोणाच्याही सार्वजनिक उपक्रमांशी संबंध नसावा. विकृत किंवा असत्य आरोपांच्या आधारे इतर पक्षांवर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर टीका करणे टाळावे.
३. मत मिळवण्यासाठी जातीय किंवा सांप्रदायिक भावनांच्या आधारे कोणतेही आवाहन केले जाणार नाही. मशिदी, चर्च, मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळे निवडणूक प्रचाराचे व्यासपीठ म्हणून वापरली जाणार नाहीत.
४. सर्व पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक कायद्यांतर्गत भ्रष्ट पद्धती आणि गुन्ह्यांचा समावेश असलेल्या अशा सर्व गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. मतदारांना लाच देऊ नये; मतदारांना धमकावू नये; मतदारांना आमिष दाखवू नये;
मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर प्रचार करु नये; मतदानाच्या तारखेआधी निश्चित केलेल्या ४८ तासांच्या कालावधीत प्रचार करु नये; तसेच प्रतिबंधित कालावधीत जाहीर सभा घेऊ नये आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करु नये.
५. कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार आपल्या अनुयायांना कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याच्या घरावर, मालमत्तेवर झेंडे लावणार नाही, बॅनर लावणार नाही, नोटीस चिकटवू देणार नाही किंवा घोषणा लिहू देणार नाही.
६. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्या समर्थकांनी इतर पक्षांनी आयोजित केलेल्या सभा आणि मिरवणुकांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही किंवा व्यत्यय आणला जाणार नाही.
एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाने ज्या ठिकाणी सभा आयोजित केल्या आहेत त्याभोवती मिरवणूक काढली जाणार नाही. एका पक्षाने लावलेले पोस्टर दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते काढणार नाहीत. । Lok Sabha Election
आचारसंहिता म्हणजे काय?। Lok Sabha Election
निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र आचारसंहिता नेमकी काय आहे? ती कधीपासून लागू केली जाते. या प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेऊयात.
देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका संपन्न व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत. त्या नियमावलीलाच आचारसंहिता म्हटले जाते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी या नियमांचे पालन करणे सरकार, राजकीय पक्ष आणि या पक्षांचे नेते यांच्यासाठी बंधनकारक असते.
केंद्र आणि राज्यातील सत्तारूढ पक्ष आणि प्रत्येक उमेदवाराने या आचारसंहितेचे पालन करावे याची निवडणूक आयोग घटनेच्या कलम 324 अन्वये खबरदारी घेते. त्याचबरोबर याचीही खबरदारी घेतली जाते निवडणुकीच्या हेतूने अधिकारी प्रणालीचा दुरूपयोग होऊ नये.
निवडणुका जाहीर झाल्या की त्या क्षणापासून सरकारी कर्मचारी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी होतात. आचारसंहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू करण्यात आलेली व्यवस्था आहे.