नवी दिल्ली – केंद्रिय निवडणूक आयोगाने देशात सार्वत्रिक तथा लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024) जाहीर केल्यानंतर आदर्श आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाली आहे. यामध्ये जसे सरकारसाठी नियम असतात, तसेच राजकीय पक्षांसाठीही प्रचारासंदर्भात अनेक नियम असतात. संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाला पोलिसांची, प्रसंगी लष्कराची मदत घ्यावी लागते.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार प्रचारासाठीची नियमावली अशी आहे…
१. कोणत्याही पक्ष किंवा उमेदवाराने धार्मिक किंवा भाषिक, जातीय आणि समुदायांमधील मतभेद वाढवणारा किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करणारी कोणतीही कृती करू नये. तसेच कोणत्याही स्वरुपात चिथावणीखोर भाषेचा वापर करु नये.
२. जेव्हा राजकीय पक्षांवर टीका केली जाते तेव्हा ती त्यांची धोरणे आणि कार्यक्रम, भूतकाळातील नोंदी आणि कार्यापुरती मर्यादित असते. पक्ष आणि उमेदवारांनी इतर पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक जीवनातील सर्व पैलूंवर टीका करणे टाळावे. या पैलूंचा कोणाच्याही सार्वजनिक उपक्रमांशी संबंध नसावा. विकृत किंवा असत्य आरोपांच्या आधारे इतर पक्षांवर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर टीका करणे टाळावे.
३. मत मिळवण्यासाठी जातीय किंवा सांप्रदायिक भावनांच्या आधारे कोणतेही आवाहन केले जाणार नाही. मशिदी, चर्च, मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळे निवडणूक प्रचाराचे व्यासपीठ म्हणून वापरली जाणार नाहीत.
४. सर्व पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक कायद्यांतर्गत भ्रष्ट पद्धती आणि गुन्ह्यांचा समावेश असलेल्या अशा सर्व गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. मतदारांना लाच देऊ नये; मतदारांना धमकावू नये; मतदारांना आमिष दाखवू नये; मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर प्रचार करु नये; मतदानाच्या तारखेआधी निश्चित केलेल्या ४८ तासांच्या कालावधीत प्रचार करु नये; तसेच प्रतिबंधित कालावधीत जाहीर सभा घेऊ नये आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करु नये.
५. कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार आपल्या अनुयायांना कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याच्या घरावर, मालमत्तेवर झेंडे लावणार नाही, बॅनर लावणार नाही, नोटीस चिकटवू देणार नाही किंवा घोषणा लिहू देणार नाही.
६. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्या समर्थकांनी इतर पक्षांनी आयोजित केलेल्या सभा आणि मिरवणुकांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही किंवा व्यत्यय आणला जाणार नाही. एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाने ज्या ठिकाणी सभा आयोजित केल्या आहेत त्याभोवती मिरवणूक काढली जाणार नाही. एका पक्षाने लावलेले पोस्टर दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते काढणार नाहीत.
7 टप्प्यात मतदान –
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. लोकसभेच्या 543 जागांवर मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे, सातवा टप्पा 1 जूनला होणार आहे. तर 4 जूनला निकाल लागणार आहे.
महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात होणार मतदान –
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा – 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ,वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा – 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा – 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा – 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ