पुणे – वैवाहिक आणि कौटुंबिक कलह सोडविण्यासाठी समुपदेशन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या “चला बोलूया’ उपक्रमातंर्गत समुपदेशनाच्या माध्यमातून मध्यम मार्ग काढत सहा वर्षांत 1,382 दाव्यात तडजोड केली आहे. 1,382 कुटुंबे जोडली आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगला कश्यप यांनी दिली.
आयटी क्षेत्राच्या वाढीबरोबर कलह आणि “इगो’ प्रॉब्लेममुळे न्यायालयात किरकोळ कारणावरून दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढली आहे. जागतिककरणामुळे लोकांकडे पैसा आला आहे. संवादाची प्रगत साधनेही आली आहेत. तरीही दुर्दैवाने लोकांतील संवाद हरवत चालला आहे. अलिकडच्या काळात पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतात.
त्यामुळे त्यांच्यातील अगदी किरकोळ वाद थेट न्यायालयात पोहोचतात. पत्नीने स्वयंपाक करण्यास नकार देणे अथवा छोट्याशा कारणाने त्यांच्यात झालेला गैरसमज थेट घटस्फोटापर्यंत पोहोचतो. तर आई-मुले, भाऊ-भाऊ यांच्यातील वादही आज न्यायालयात पोहोचू लागले आहेत. अगदी किरकोळ-किरकोळ कारणावरून सख्ख्या भावांमध्ये 10 ते 20 वर्षे संवाद होत नसल्याचे अनेक प्रकार विविध खटल्यातून दिसून आले आहेत. तर, समुपदेशनामुळे छोटे-छोटे गैरसमज दूर होण्यास मदत होत आहे. आता तर काही न्यायालयात समुपदेशनही ऑनलाइन होऊ लागले आहे. विधी सेवा प्राधिकरणाने समुपदेशानाद्वारे केलेल्या तडजोडीमुळे वादी आणि प्रतिवादी दोन्हीही पक्षकार खुष होतात. त्यांच्यात कायमचा संवाद निर्माण होता. आनंदाने घरी जातात. असेही प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.
कौटुंबिक वादातील अनेक खटले दाखल होतात. बऱ्याचदा किरकोळ गैरसमजामुळे असे खटले दाखल झालेले असतात. असे खटले वर्षानुवर्षे चालतात. मात्र, समुपदेशात हे गैरसमज दूर होतात. विशेष म्हणजे समुपदेशनानंतर दोन्हीही पार्टी आनंदी असतात. समाधानाने घरी जातात. त्यांचा वेळ, पैसा वाचतो. प्रकरणे लवकर निकाली निघतात. होणारा मानसिक त्रास वाचतो.
– ऍड. खंडेराव टाचले, शिवाजीनगर न्यायालय