नवी दिल्ली – उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ मार्गावरील गौरीकुंडमध्ये भूस्खलनामुळे 19 जण बेपत्ता झाले आहेत. यापैकी चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप बेपत्ता 15 जणांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. रात्री उशिरापासून येथे मुसळधार पाऊस चालू असल्याने हा अपघात झाला आहे. पावसामुळे दगड तुटल्याची माहिती रात्री उशिरा मिळाल्यानंतर एसडीआरएफसह जिल्हा प्रशासनाचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र रात्री पावसामुळे अडथळे आल्याने काम थांबावावे लागले.
यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र संततधार पाऊसाचे आव्हान कायम आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, केदारनाथ यात्रा मार्ग गौरीकुंड दातपुलियाजवळ झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या भुस्खलनात 19 लोक बेपत्ता आहेत. त्यातील चार लोकांचे मृतदेह बचाव पथकांनी बाहेर काढले आहेत.
दुसरीकडे, हिमाचलमध्ये या पावसाळ्यात आतापर्यंत 199 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 बेपत्ता आहेत. 199 मृत्यूंपैकी 57 मृत्यू भूस्खलन आणि पुरामुळे झाले, तर 142 लोकांचा पावसाळ्यात रस्ते अपघातात मृत्यू झाला. “या पावसाळ्यात हिमाचलला खूप नुकसान झाले आहे. आतापर्यंत 6563.58 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे,’ अशी माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिवांनी दिली आहे.
पावसामुळे आलेल्या पुरामुळे राज्यात 774 घरे पूर्णपणे उद्वस्त झाली आहेत, तर 7317 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 254 दुकाने आणि 2337 गोशाळांचेही नुकसान झाले आहे. आकडेवारीनुसार, राज्यात 79 भूस्खलनाच्या घटना घडल्या. राज्यात सुमारे 300 रस्ते बंद आहेत. 274 वीज आणि 42 पाणीपुरवठा योजना अजूनही ठप्प आहेत.
डोंगराळ भागांना अलो अलर्ट
उत्तराखंडमध्ये डोंगरापासून मैदानापर्यंत मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे हवामान विभागाने डेहराडून, हरिद्वार, पौरी, नैनिताल, चंपावत, उधम सिंह नगर, चमोली आणि बागेश्वर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.