प्रभात रायटर्सच्या लेखिका, “रानवाटा’ निसर्गसंस्थेच्या अध्यक्ष आणि व्यवसायाने वकील असलेल्या सीमंतिनी नूलकर यांचे “लदाख-भारताचा अद्भुत मुकुटमणी’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय असून, लदाख या भारताच्या नव्या केंद्रशासित प्रदेशाविषयी सहसा कुणाला माहिती नसलेले तपशील या पुस्तकात वाचायला मिळतात.
जम्मू-काश्मीर राज्याचा अविभाज्य भाग असलेलं, हिमालयाच्या पर्वतशिखरांनी वेढलेलं, विस्तीर्ण पठार, डोंगरकडे आणि हिमालयीन नद्या-सरोवरे यांची भूमी असलेल्या पहाडी लदाखविषयी समस्त भारतीयांच्या मनात असलेलं कुतूहल शमवणारं हे पुस्तक आहे.
लदाख इतकं सुंदर आहे की, तिथून पाय निघतच नाही. लेखिकेने लदाखला इतक्यावेळा भेट दिली आहे की, तिच्यासाठी ते एक दुसरे घरच बनले आहे. अतिशय प्रेमळ लदाखी लोक, तेथील स्त्रिया, परिसराची इत्यंभूत माहिती असलेले गाईड्स आणि मनमोहक वातावरण या सगळ्याचा परिणाम माणसाच्या मानसिकतेवर होतो आणि सकारात्मक जीवनाचे एक विलोभनीय दर्शन नूलकर यांच्या या पुस्तकातून घडते.
लदाख सतत निसर्गाच्या रौद्र रुपाच्या छायेत असतो. एकीकडे रौद्र रुप धारण करणारा निसर्ग आणि दुसरीकडे चीन-पाकिस्तानसारखी भारताची शत्रुराष्ट्रे यामुळे सतत अनिश्चिततेच्या छायेतलं, लदाखी लोकांचं असुरक्षित जीवनमान पाहून लेखिका दु:ख व्यक्त करताना दिसते. लदाखमधल्या अतिशय लहरी आणि विपरीत अशा हवामानामध्ये भारतीय जवान ज्या देशप्रेमाने आपले कर्तव्य बजावताना दिसतात; त्यांच्याच जोडीने सर्वसामान्य लदाखी माणूसही “बिनावर्दीचा जवान’च असतो, असे लेखिकेचे म्हणणे आहे. या लोकांमुळेच सर्वसामान्य भारतीय नागरिक सुखाचा श्वास घेऊ शकतोय; पण या भारतीयांना लदाखमधल्या या सैनिकांच्या त्यागाची तितकिशी जाणीव नसावी, याबद्दलही लेखिका वैषम्य व्यक्त करते.
“चांद्रभूमी लदाख’, “बर्फ जेथे कधीच वितळत नाही’, “भारताचा मानबिंदू सिंधु,’ “फुलों की घाटी नुब्रा व्हॅली’, “पॅंगॉंग त्सो (तलाव)’, “लदाखचे मूलनिवासी -द्रोकपा’, “लदाखची लोकसंस्कृती’ “कृष्णगिरी काराकोरम’ अशा विविध प्रकरणांतून लदाखची सखोल ओळख वाचकाला होत रहाते.
लदाखला “लॅंड ऑफ बुद्ध’ अर्थात बुद्धाची भूमी असंही म्हटलं जातं. बौद्ध धर्मात भगवान बुद्धांना “ज्वेल इन द लोटस’ असं म्हणतात. लदाखही असंच आहे, भारतरुपी कमळामधलं बौद्ध संस्कृतीचा साज ल्यालेलं अनमोल असं रत्न आहे, हे लेखिका आवर्जून सांगते.
मुंबईच्या “अनुभव अक्षरधन’या संस्थेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं निर्मितीमूल्य उच्च दर्जाचं आहे. लेखिकेची कमालीची ओढाळ लेखनशैली, स्वत: लेखिकेसह संदीप देसाई, चिन्मय खवले आणि आंगचुक दोरजे यांची नयन मनोहर छायाचित्रे, आर्टपेपरवरील छपाई यामुळे पुस्तक वाचनीय आणि प्रेक्षणीय तर झाले आहेच, शिवाय हे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ स्वरुपातही प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या पर्वतरांगा, खिंडी, तलाव, निसर्गसंपदा याची माहिती आणि नकाशे यामुळे पुस्तकाला संदर्भमूल्यही प्राप्त झाले आहे. लदाखचे सांस्कृतिक दूत नवांग शाकस्पो यांची प्रस्तावनाही भावस्पर्शी आहे.
लदाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर लगेचच प्रसिद्ध झालेले हे मराठीमधले पहिले पुस्तक आहे. ते वाचून तुम्हालाही लदाखला भेट देण्याची इच्छा होईलच. तेच या पुस्तकाचे यश असेल.
– श्रुती कुलकर्णी