टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात बैलपोळानिमित्त साज-शृंगाराची दुकाने थाटली गेली होती. मात्र, पावसाने बऱ्याच दिवसापासून दडी मारल्याने व दोन-तीन दिवसांपूर्वी काही प्रमाणात बरसलेल्या पावसाने बळिराजामध्ये कही खुशी कही गम दिसून येत होते. त्याचेच सावट काही अंशी आजच्या बैलपोळ्याच्या बाजारावर पडलेले दिसले.
बैलपोळ्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व आहे. पारंपरिक व लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या या सणावर यंदा दृष्काळसदृश परिस्थिती व महागाईचे सावट आहे. वर्षानुवर्षे बैल सजावटीच्या साहित्यात वाढ होताना दिसून येत आहे. तरीही या सणाला पोटाला चिमटा घेऊन का होईना, पण आपल्या सर्जा-राजासाठी शृंगाराचे साहित्य शेतकरी घेतोच. आजच्या बैलपोळा बाजारात चौरंग, मठाठी, वेसन, दोर, माळ, मोरकीचा समावेश आहे. बैल हा शेतकऱ्यांचा जोडीदार आहे. वर्षभर इमाने इतबारे तो शेतात राबतो. त्याच्या या णातून उतराई होण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलाची रंगरंगोटी व सजावट करून बैलांची पुजा केली जाते.
यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड पाडल्याने पिकांची परिस्थिती नाजूक होती. मात्र, सप्टेंबरमधील गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसाने काही प्रमाणात बळिराजा सुखावला आहे.
बैलांच्या संख्येत घट!
सद्यःस्थितीत ट्रॅक्टरची संख्या वाढली असून, बैलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यातच निसर्गाचा लहरीपणा व साज शृगांराच्या दरात झालेली मोठी वाढ या सर्व बाबींचा आजच्या भरलेल्या पोळा बाजारावर काही अंशी सावट पसरले आहे.