पुणे – कोरोनाची भीती बाळगायची गरज नाही. आपल्याकडे स्वाईन फ्लू सारखे अनेक संसर्गजन्य आजार आले आणि गेले. मात्र त्यासाठी पॅनिक होण्याची गरज नाही असे मत लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले. त्या पुण्यात बोलत होत्या.
कानिटकर या डेप्युटी चीफ इंटिग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकल या पदावर काम करतात. त्यामुळे भारतीय जवानांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘कोरोनाच्या निवारणासाठी देशभर लष्करी वैद्यकीय विभागातून जी काही मदत लागेल ती आम्ही देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा सरकारचे सर्वत्र लक्ष असते. आम्ही जवानांना सूचना दिल्या आहेत की सारखे हात धुवावेत,स्वछता राखावी. सर्दी आणि इतर संसर्गजन्य आजार झाले तर मास्क वापरावेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. होळी खेळूच नये असे सांगितले नसले तरी गर्दीत न जाण्याचा सल्ला मात्र दिला आहे.