नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षासमोर समाजवादी पक्षाने खडतर आव्हान उभं केलं आहे. भाजपला एकापोठापाठ एक धक्का देत समाजवादी पक्षाने भाजपचे अनेक नेते आपल्या पक्षात दाखल करून घेत आगेकूच केली आहे. भाजपमधून समाजवादी पक्षात दाखल झालेल्या नेत्यांचा तब्बल १३७ मतदार संघात प्रभाव असल्याचं सांगण्यात येत.
समाजवादी पक्षाला या नेत्यांचा किती फायदा होऊ शकतो, या नेत्यांच्या मागे किती जनाधान आहे, त्यांचा कोणत्या समाजातील मतदारांवर प्रभाव आहे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा खेळ बिघडवण्यासाठी हे नेते समाजवादी पक्षासाठी किती फायदेशीर ठरू शकतात, हे आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.
उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक जाहीर होताच, भाजपमधून आत्तापर्यंत एकूण तीन मंत्री आणि ११ आमदारांनी राजीनामा दिला असून एकूण १४ नेत्यांनी पक्षांतर केले आहे. यातील बहुतांश नेत्यांनी समाजवादी पक्षाचा हात धरला. ज्या १४ नेत्यांनी भाजपाला राम राम ठोकला त्यातील १० नेते हे ओबीसी समुदायातील आहेत. या नेत्यांचा १३७ जागांवर प्रभाव दिसून येतो. भाजप सोडणाऱ्या १४ नेत्यानं मध्ये स्वामी प्रसाद मौर्य, अवतार सिंह भड़ाना, दिग्विजय नारायण जय चौबे, राधाकृष्ण शर्मा आणि बाला प्रसाद अवस्थी यांना सोडल्या, उर्वरित नेते भाजपची वोटबँक असलेल्या समाजातील आहेत. त्यामुळे आत्ता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय.
स्वामी प्रसाद मौर्य
स्वामी प्रसाद मौर्य रायबरेलीच्या ऊंचाहार मधून आपल्या राजकारणातील कामगिरी मुळे चमकले. त्यांना ओबीसी वर्गाचा चेहरा मानलं जातं. सध्या ते कुशीनगरच्या पडरौनाचे आमदार आहेत.२०१६ मध्ये बसपा सोडून भाजपमध्ये आलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात श्रम आणि रोजगार मंत्री म्हणून काम केलं. स्वामी यांचा प्रभाव आग्रा, जौनपुर, गाजीपुर, बलिया, मऊ, कुशीनगर, गोरखपुर आणि महाराजगंज या क्षेत्रात अधिक असल्याचं मानलं जातं. तर रायबरेली ते शाहजहांपुरपासून बदायूंपर्यंत मौर्य समाजातील मतांची संख्या ६ ते ८ टक्के एवढी आहे. आत्ता स्वामी या समाजाला समाजवादी पक्षाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपसाठी ही डोकेदुखी ठरू शकते.
धर्म सिंह सैनी
सहारनपुरच्या सोना गावातून बाहेर पडून राजकारणात मोठे नाव मिळवणारे धर्म सिंह सैनी हे योगी सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते. त्यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांना समर्थन देत भाजपला रामराम ठोकला. सहारनपुरमधून बीएएमएसची पदवी घेऊन त्यांनी आयुर्वेदिक डॉक्टरचा व्यवसाय सुरू केला. २०१७ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. धर्म सिंह सैनी यांचा प्रभाव गंगोह, सहारनपुर, देवबंद, नकुड़, बेहट, रामपुर मनिहारन येथील या भागात दिसून येतो.
दारा सिंह चौहान
चौहान समाजातील मोठे नेते म्हणून दारा सिंह चौहान यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधीच बसपा मधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मऊ मधील मधुबन विधानसभा मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. योगींच्या मंत्रीमंडळात ते पर्यावरण मंत्री होते. मधुबन, मऊ, मोम्मदाबाद, बलिया, आजमगढ़सह १० जिल्ह्यांमध्ये दारा सिंह चौहान यांचा प्रभाव आहे.
अवतार सिंह भड़ाना
अवतार सिंह भड़ाना कयाना गुर्जर समाजातील मोठे नेते मानले जातात. भड़ाना १९८८ साली हरियाणाचे मुख्यमंत्री चौधरी देवीलाल यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. भड़ाना यांचा नोएडा, दादरी, जेवर, बुढ़ाना, मीरापुर, मुजफ्फरनगर, खतौली, चरथावल आणि पुरकाजी येथे प्रभाव असल्याचं सांगितलं जातं.
भगवती सागर
कानपुर देहात मधून आलेले भगवती प्रसाद सागर यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बसपा मधून झाली. ते दोनवेळा मंत्री देखील झाले. एलएलबीपर्यंत शिक्षण प्राप्त केलेल्या भगवती सागर यांना आपल्या मुलाला राजकारणात स्थिर करायचे आहे. मात्र भाजप त्यासाठी अनुकूल नव्हतं. यातूनच त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत. भगवती सागर यांचा प्रभाव बिल्हौर, घाटमपुर, मऊ आणि रानीपुरमध्ये दिसून येतो.
रोशनलाल वर्मा
२०१७ च्या विधानसभा निवडणूकच्या वेळी बहुजन समाज पक्षाला सोडचिट्ठी देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होते. योगी सरकारमध्ये असताना त्यांचा कॅबिनेट मंत्र्यासोबत वाद झाले होते. शिवाय वर्मा हे स्वामी प्रसाद मौर्य यांचे निकटवर्तीय मानले जातात. वर्मा यांचा तिलहर, शाहजहांपुर, कटरा, जलालाबाद, दलौला, पुवैयां या भागांत प्रभाव आहे.
विनय शाक्य
विनय शाक्य यांनी कौटुंबिक वादातून भाजपमधून काढता पाय घेतल्याचं सांगण्यात येत. विनय शाक्य हे स्वामी प्रसाद मौर्य यांचे समर्थक मानले जातात. बिधुना, औरैया आणि दिबियापुरमध्ये शाक्य यांचा प्रभाव आहे.
बृजेश प्रजापती
स्वामी प्रसाद मौर्य याना आपला नेता मानणारे बृजेश प्रजापती योगी सरकारच्या कारभावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. बृजेश प्रजापती यांचा तिंदवारी, बांदा, बबेरू, नरैनी या भागांत प्रभाव दिसून येतो.
मुकेश वर्मा
बहुजन समाज पार्टीमधून निवडणूक लढणाऱ्या मुकेश वर्मा यांना तिकीट न मिळण्याची धास्ती होती. त्यांच्यावर मतदार संघातील नागरिक नाराज आहेत. डॉ. वर्मा यांचा प्रभाव शिकोहाबाद, फिरोजाबाद, सिरसागंज, जसराना, टुंडला या प्रदेशात दिसून येतो.
माधुरी वर्मा
माधुरी वर्मा राजकारणी कुटुंबातील आहेत. त्यांचे पती दिलीप वर्मा हे समाजवादी पक्षाशी जोडले असून महसी विधानसभाचे दोन वेळा आमदार झाले होते. गेल्यावेळी काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना परत एकदा तिकीट न मिळण्याची भीती असून त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. माधुरी वर्मा यांचा प्रभाव नानपारा, बहराइच, बलहा, महसी, पयागपुर, कैसरगंज या विभागात दिसून येतो.
दिग्विजय नारायण जय चौबे
दिग्विजय नारायण जय चौबे यांनी आता भाजपची साथ सोडली. स्थानिय पातळीवरील त्यांच्या कामकाजामुळे त्याच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचं कळतं. यामुळे त्यांना तिकीट मिळणार नाही, याची भीती होती. खलीलाबाद, संत कबीर नगर, मेहदावल, धनघटा या ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे.
राधाकृष्ण शर्मा
राधाकृष्ण शर्मा यांनी २०१७ साली भाजपमध्ये प्रवेश करत बिल्सीमधून विजय मिळवला होता. पुन्हा तिकीट न मिळण्याच्या भीतीमुळे त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राधाकृष्ण शर्मा यांचे बिल्सी, बदायू, कासगंज, कादरगंज या भागात वर्चस्व असल्याचं सांगण्यात येत.
बाला प्रसाद अवस्थी
लखीमपुर खीरीमधील धौरहराचे आमदार बाला प्रसाद अवस्थी यांनी योगी सरकारवर ब्राम्हण समाजाची उपेक्षा केल्याचा आरोप करत राजीनामा दिलाय. त्यांना तिकीट न मिळण्याची भीती होती. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचे कळत. त्यांचा प्रभाव धौरहरा, लखीमपुर, पलिया, निघांसन, श्रीनगर, मोहम्मदी, कस्त भागात दिसून येतो.
राजेश राठोड
भाजप नेत्यांसोबत ताळमेळ जुळत नसल्याने राजेश राठोड यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत. राठोड यांचा महोली, सीतापुर, हरगांव, लहरपुर, बिसवां, महमूदाबाद, सिधौली, मिश्रिख विभागात प्रभाव दिसतो.