- आत्करगाव, आडोशी, चिंचवली, टेंभेवाडी, होनाड, आत्करगाववाडी, कुंभेवाडी, जंगमवाडी येथील ग्रामस्थांनी घेतल्या हरकती
खालापूर – खालापूर तालुक्याला औद्योगिक वसाहतीचे माहेरघर म्हटलं जात असून, या तालुक्यात असंख्य प्रकारचे विविध कारखाने बस्तान मांडून असल्याने अनेक कामगारांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असून, असंख्य जण समाधान व्यक्त करीत असले तरी काही कारखानदारांवर ग्रामस्थ तीव्र विरोध दर्शवत असतात. असाच विरोध खालापुरातील आत्करगाव, आडोशी, चिंचवली, टेंभेवाडी, होनाड, आत्करगाववाडी, कुंभेवाडी, जंगमवाडी ग्रामस्थांनी आत्करगाव येथे नव्याने येणाऱ्या जैव वैद्यकीय कचरा निवारण प्रकल्पाला केला असून, हा प्रकल्प नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरणारा असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. तर या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी संबंधित लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाला निवेदन देत विरोध केला असताना नुकताच कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण आत्करगाव येथील सर्व्हे. नं. 231 मध्ये मूळ मालक साहुवाला पास्तास संजीव खंडेलवाल ही जागा मे. एस. एम. एस. एन ओल्वीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने जैव वैद्यकीय कचरा निवारण प्रकल्पासाठी खरेदी करीत आहेत. तरी ग्रुप ग्रामपंचायत आत्करगाव यांच्याकडून ना-हरकत दाखला घेतला आहे. परंतु हा दाखला रद्द करण्यासाठी 16 मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसभा घेण्यात आली.
या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांनी दिलेला दाखला रद्द करावा, असा ठराव घेण्यात आला होता, तेव्हापासून ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध तीव्र दर्शवत या प्रकल्पाविरोधात आपला न्याय मिळावा म्हणून लढा उभारला आहे.
या प्रकल्प ज्या जागेमध्ये उभारण्यात येणार आहे, त्या प्रकल्पासून 200 मीटर अंतरावर गाव असल्याने या जमिनीला लागून नदी देखील असून, 500 मीटर अंतरावर पाझर तलाव आहे. तसेच आडोशी येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात धबधब्यासाठी व पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यावर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या व्यतिरिक्त या जागेभोवती मंदिर, बस स्टॅण्ड, हॉटेल, इंडस्ट्रिज, शाळा असून, या प्रकल्प उभारण्यात आल्यास या जैव कचरा कुजल्याने त्याची दुर्गधी ही हवेत पसरुन त्याचा सर्व त्रास ग्रामस्थांना होणार आहे.
त्याचप्रमाणे जैव कचरा कुजल्याने त्यातून निर्माण होणारे विषाणू नदीच्या पाण्यात व पाझर तलावात मिसळून पाणी दूषित होऊन ते पाणी ग्रामस्थ, गुरेढोरे यांनी प्यायल्यास या पाण्यापासून अनेक साथीचे आजार पसरून ग्रामस्थांचे जीवन विस्कळीत होऊन जाईल. त्याचप्रमाणे या जैव कचऱ्याच्या विघटनाचा वास हवेत मिसळल्याने ग्रामस्थ व चालू असलेल्या इंडस्ट्रिजमधील कामगारांना त्यामुळे प्रचंड शारीरिक नुकसान होणार असल्याने ग्रामस्थांनी कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या.
या वेळी आत्करगाव माजी उपसरपंच तथा शेकाप तालुका चिटणीस संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील, माजी सरपंच भाऊ गायकवाड, मनोहर शिंदे, आत्करगाव शिवसेना शाखाप्रमुख नितेश पाटील आदी उपस्थित होते. प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असून, या संदर्भात ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे व एम.पी.सी.बी (प्रदूषण नियंत्रण मंडळ) कोकण भवन, खालापूर तहसीलदार, गटविकास अधिकारी खालापूर पंचायत समिती यांना त्या आशयाचे पत्र व्यवहार केला आहे.
आत्करगाव येथे येणाऱ्या जैव वैद्यकीय कचरा निवारण प्रकल्पाने परिसरात मोठी दुर्गधी पसरणार असल्याने आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध असून, त्या आशयाचे सर्व पत्रव्यवहार संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाला केले आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारा व्यवसायाचे सर्व परवाने रद्द करावे.
– संदीप पाटील, माजी उपसरपंच, आत्करगावआमच्या गावाच्या परिसरात येणारा हा प्रकल्प आमच्या आरोग्यासाठी धोकादायक असून; हा प्रकल्प कधापी आम्ही ग्रामस्थ सुरू करू देणार नाही.
– नितेश पाटील, ग्रामस्थ, आत्करगाव