पुणे -कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी होती. यामध्ये एकूण पाच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, निवडणुकीसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान कसब्यातील निवडणूक प्रामुख्याने दुरंगी होणार असून, भाजप आणि कॉंग्रेसमध्येच जोरदार लढत पहायला मिळणार आहे.
कसबा विधानसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर गुरुवार (दि.9) पासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी अर्ज माघारी घेतला. तर शुक्रवारी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतला.
कसबा निवडणुकीसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे. अर्ज माघारीनंतर उमेदवार निश्चित झाल्याने लगेचच अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. आता, प्रचाराचावेग वाढणार असून यासाठी राजकीय पक्षांची यंत्रणा तयारी लागली आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी दि.26 फेब्रुवारीला मतदान तर मतमोजणी दि.2 मार्च 2023ला होणार आहे.
पोटनिवडणूक न लढवण्याचा आम आदमी पक्षाचा निर्णय
पुणे, दि. 10 -कसबा विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. या निर्णयानुसार आपचे उमेदवार किरण कद्रे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत “आप’च्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरला होता.
दिल्लीतील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उत्तम आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासकीय सेवा यांचे विकासाचे मॉडेल लोकांना मनापासून आवडले आहे. पंजाबमध्येही याच मॉडेलच्या धर्तीवर आम आदमी पक्षाच्या सरकारचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल राज्यातील जनतेमध्ये लवकरच येतील आणि याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून होईल. सध्या, आम आदमी पक्षाने विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर संभाजी ब्रिगेडची माघार
पुणे, दि. 10 -कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणातून संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी माघार घेतली. शिवसेना नेत्यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली असून त्यामुळे महाविकास आघाडीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कसबा पेठेत महाविकास आघाडीच्या वतीने कॉंग्रेसने उमेदवार दिला आहे, तर चिंचवड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या दोन्ही ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज भरले होते. संभाजी ब्रिगेडची शिवसेनेशी युती आहे. शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.शिवसेना संपर्क प्रमुख अहिर यांनी संभाडी ब्रिगेडच्या नेत्यांची भेट घेतली, त्यानंतर महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला.