प्रक्षाळ पुजेने माऊली पुन्हा समाधीस्त
आळंदी – कार्तिकी यात्रा सोहळ्यानंतर आज (मंगळवारी) प्रक्षाळ पुजेने माऊली पुन्हा समाधीस्त झाली.
नुकत्याच झालेल्या कार्तिकी वारीनंतर माऊलींना गरम -लिंबू पाण्याने आंघोळ घालण्याची परंपरा गेली सातशे वर्षांपासून चालत आली आहे. कार्तिक वारीनंतर पहिल्याच आठवड्यात आज (मंगळवारी) सकाळी सात ते दहा यावेळेत माऊलींच्या संजीवन समाधीवर कोमट पाणी व लिंबू लावून पवित्र असे स्नान घालण्यात आले. यालाच प्रक्षाळ पुजा असे संबोधले जाते.
- कार्तिक वारी सोहळ्याची भक्तिभावात सांगता
कार्तिक वारीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच कार्तिक वद्य अष्टमी ते अमावस्येपर्यंत अलंकापुरी नगरीत माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हा तब्बल आठ ते दहा दिवस सुरू असतो. या कालावधीत संपूर्ण अलंकापुरी नगरी भक्तीरसात चिंब होऊन जाते. यावेळी माऊली जणूकाही दहा दिवस लाखो यांच्यासमवेत असल्याचा भास होतो. यामुळेच वारीतील सर्वांवर आलेला ताण हा प्रक्षाळ पूजा दिनी माऊलींच्या संजीवन समाधीवर कोमट पाणी लिंबू यांचा वापर करून समाधीला पवमान अभिषेक घातला जातो.
- दहा दिवसाच्या कालावधीत अलंकापुरीत उत्साह
आजच्या प्रक्षाळ पूजा दिनी सकाळी सात ते दहा या वेळेत पुजारी श्रीनिवास कुलकर्णी यांच्या हस्ते संजीवन समाधी पूजा घालण्यात आली. या पूजेचे आजचे मानकरी विश्वस्त डॉ. अभय टिळक, माऊली वीर मालक बाळासाहेब आरफळकर रामभाऊ चोपदार राजाभाऊ चोपदार श्रीधर सरनाईक बल्लाळेश्वर वाघमारे, व इतर सर्व सेवेकरी तसेच आळंदीकर नागरिक भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी सात ते साडे दहा यावेळेस अलंकापुरी नगरीतील स्थानिक रहिवाशांनी माऊलींना लिंबू पाण्याने स्नान घातले 11 ते 12 या वेळेत पवन पूजा झाली. तद्नंतर श्रींना महानैवेद्य देण्यासाठी दर्शनबारी बंद करण्यात आली. यालाच यात्रा कालावधीनंतर प्रक्षाळ पूजेदिनी “भाग गेला सिंह गेला अवघा झाला आनंद सखा माझा ज्ञानेश्वर पुन्हा समाधिस्थ झाला’ या उक्तीनुसार या कार्तिक वारी सोहळ्याची सांगता झाली.