सातारा – सीमावादाबाबत महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या दाव्याची सुनावणी बाकी असताना या दाव्यावर लक्ष विचचित करण्यासाठी कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील 20 गावांवर हक्क सांगितला आहे. कर्नाटक पंढरपूरवरही हक्क सांगेल एवढेच नव्हे तर मुंबई, नागपूरवरही ते हक्क सांगतील, अशी टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. सीमा भागातील जनतेवर कर्नाटक सरकारकडून अन्याय होत असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, अशी सूचनाही श्री. चव्हाण यांनी केली.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “”सीमा प्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारने 2004 मध्ये न्यायालयात टाकलेल्या दाव्याची सुनावणी झालेली नसताना कर्नाटक सरकारने 2014 मध्ये प्रतिदावा टाकला. वास्तविक पहिल्या दाव्याची सुनावणी झालेली नसताना प्रतिदाव्याप्रमाणे हक्क सांगणे चुकीचे आहे. सीमाप्रश्नाबाबत 14 सदस्यीय उच्चाधिकार समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. देशातील सर्वोत्कृष्ट वकील देऊन न्यायालयात ताकदीने बाजू मांडण्याची सूचना समिती सदस्यांनी केली आहे.
राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधानांना या प्रश्नी भेटावे, अशी सूचना केली आहे.” सीमाभागातील लोकांवर कर्नाटक सरकार करत असलेल्या अन्यायाबाबत राज्य सरकारने आवश्यक ती भूमिका घ्यावी, अशी सूचना केल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा कॉंग्रेस पक्षाला निश्चित बळकटी देणारी ठरणार आहे. भाजपने देशात चालवलेल्या सुडबुध्दीच्या, जातीभेदाच्या राजकारणाला शह देण्यासाठी ही यात्रा आहे.
कॉंग्रेसचा हा राष्ट्रव्यापी कार्यक्रम यशस्वी झाला आहे. राज्य सरकार अद्यापही अस्थिर असून न्यायालयात काय निकाल होतोय त्यावर सरकारचा फैसला आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार हे सरकार टिकणार नाही अशी परिस्थिती आहे. मात्र, न्यायालयात काय निर्णय होतोय तो पाहावा लागेल, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. विकासापेक्षा अन्य मुद्यांवर सरकारचे लक्ष असून अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सावरकरांच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांनी पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे.
सावरकरांनी काही चांगलीही कामे केली आहेत. मात्र, राहुल गांधीनी केलेल्या टीकेवर कॉंग्रेस पक्ष आजही ठाम आहे, असे त्यांनी सांगितले. प्रतापगडावरील अफजलखान कबर वादावरुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला गरजेचा आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील निवडणुकीत सध्या तरी तशी मानसिकता दिसत नसल्याचे आ. चव्हाण यांनी नमूद केले. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई आदी उपस्थित होते.
राज्यपालांचा मुख्यमंत्रिपदावर डोळा
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री व्हायचे असल्याने महापुरुषांबद्दल ते बेधडक वक्तव्य करत आहेत, असा आरोप आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. बेताल वक्तव्ये करुन त्यांच्याकडून संविधानिक पदाचा अवमान होत आहे. राज्यपाल पदावरुन पायउतार होऊन मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठीच त्यांचा हा उद्योग सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांची वक्तव्य मान्य आहेत की काय असा प्रश्नही श्री. चव्हाण यांनी उपस्थित केला.