मुंबई – बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ (Jawan) चित्रपटाने वादळ आणलं असून अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा आपल्याला बॉलिवूडचा ‘बादशाह’ का म्हणतात हे दाखवून दिलं आहे. जवान (Jawan) चित्रपटाने चित्रपटगृहांना असे दिवस दाखवले आहेत, ज्यांचा कधी त्यांनी विचारही केला नसावा.
पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडणाऱ्या जवान चित्रपटाचं वेड चौथ्या दिवशीही कायम राहील असून, सध्या या चित्रपटाने 550 कोटींचा टप्पा पार केला आहे. येणाऱ्या काळात देखील हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
‘जवान’ चित्रपटात प्रेक्षकांना साऊथचा तडका, बॉलिवूडचा मसाला बघायला मिळतो आहे. मात्र, सध्या या सिनेमातील किंग खानचा एक डायलॉग चांगलाच चर्चेत आला आहे, “बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर…’ असं शाहरुख बोलताना दिसतो.
सोशल मीडियावर असं देखील बोलण्यात आलं होत की, हा डायलॉग समीर वानखेडे (sameer wankhede) यांना उद्देशून आहे. शाहरुखने या डायलॉगमधून समीर वानखेडेंनाच इशारा दिलाय का? अशी चर्चा नेटकरी करत होते. मात्र, आता या डायलॉग बद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे.
या सिनेमाचे डायलॉग लिहीणारे लेखक सुमित अरोरा म्हणतात, “हा डायलॉग खरंतर शूटिंगच्या दिवशीच घेण्यात आला. यामागच्या गोष्टीमुळे तुम्ही फिल्ममेकिंगच्या जादूवर विश्वास कराल. हा डायलॉग खरंतर ओरिजनलल स्क्रिप्टमध्ये नव्हताच.
जेव्हा शाहरुख हा डायलॉग बोलतो तेव्हा असं वाटतं की हे लिहिलेलंच होतं. पण आम्हाला माहितीये की तो क्षण कोणत्याही डायलॉगशिवायही खूप पॉवरफुल होता. मात्र प्रत्यक्ष शूटिंग करताना असं वाटलं की काहीतरी लाइन पाहिजे, हा माणूस काहीतरी बोलला पाहिजे. तेव्हा हा डायलॉग बोलण्यात आला होता.
ते पुढे म्हणतात, त्या दिवशी मी सेटवरच होतो. मला बोलावण्यात आलं. आणि सिनेमातील तो सीन पाहून आपसूकच माझ्या तोंडातून निघालं.. “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर..’ तेव्हा असं वाटलं की ही लाइन त्या सीनसाठी अगदी योग्य आहे.’ आणि अश्या पद्धतीने हा सीन पूर्ण करण्यात आला.
आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक !
2021 साली समीर वानखेडेंच्या नेतृत्वात एनसीबीने मुंबईतील एका क्रूझवर धाड टाकली होती. या धाडीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. देशभर हे प्रकरण खूप गाजले होते.
या कारवाईनंतर समीर वानखेडे देशभर चर्चेत आले होते. पुढे न्यायालयीन सुनावणी दरम्यान आर्यन खान याची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली. यासोबतच न्यायालयाने समीर वानखेडेंच्या टीमवर जोरदार ताशेरे देखील ओढले होते.