हिंजवडी – पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंजवडी पोलिसांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पोलीस ठाण्याच्या सभागृहात भरवलेल्या या दरबारात 50 हून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीमधील परिमंडळ 1 व 2 मधील पोलीस उपायुक्त यांना जनता दरबार घेऊन नागरिकांना असलेल्या तक्रारींचे निरसन करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवारी 13 ऑगस्ट रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सकाळी 11 च्या सुमारास जनता दरबार घेतला.
या जनता दरबारात हिंजवडी पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जामधील अर्जदार व गैरअर्जदार यांना बोलाविण्यात आले होते. या वेळी आनंद भोईटे यांचे उपस्थितीत अर्जदार यांनी केलेल्या तक्रारीबाबत अर्जदार व गैरअर्जदार यांचे म्हणणे ऐकून घेतले व सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अधिकारी यांना सूचना व मार्गदर्शन करुन अर्जदार यांचे तक्रारीचे निरसन करण्यात आले. या वेळी हद्दीतील माण, मारुंजी नेरे, कासारसाई, सूस, म्हाळुंगे, बावधन, जांबे या गावातील अर्जदारांच्या 50 हून अधिक तक्रारींचे निरसन करण्यात आले. अशी माहिती हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली.
या वेळी सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डीसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहिफळे व हिंजवडी पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
हिंजवडीकरांकडून अधिकाऱ्यांचे कौतुक
हिंजवडीत जनता दरबार भरवून परिसरातील प्रकरणांचा निपटारा केल्याबद्दल तसेच हिंजवडीतील म्हातोबा मंदिरातील चोरी प्रकरणाचा तत्काळ तपास करून चोरट्यांना जेरबंद केल्याबद्दल हिंजवडी ग्रामपंचायतीचे सरपंच विक्रम साखरे, युवा नेते सुरेश हुलावळे, शंकर हुलावळे, विशाल साखरे, सचिन जांभुळकर, संदीप साखरे आदी ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानत पुष्पगुच्छ देऊन हिंजवडीकरांच्या वतीने स्वागत केले.