श्रीनगर – काश्मीर मधील दहशतवाद वेगाने कमी होत आहे. लवकरच या दहशतवादाला पूर्णविराम मिळेल असे जम्मू-काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबग सिंग यांनी सांगितले. बरोबर दोन वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीर संबंधातील 370 कलम रद्द करण्यात आले होते.
काश्मीर मधील राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या या धोरणाला कडाडून विरोध केला असला तरी काश्मीरमधील हिंसाचार झपाट्याने कमी होत असल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. दोन वर्षापूर्वी 370 कलम रद्द करण्याबरोबरच जम्मू व काश्मीर आणि लडाखचे दोन वेगळ्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन करण्यात आले होते. त्यानंतर काश्मीर बाहेरील व्यक्तीला काश्मीर मध्ये जमीन घेण्याची परवानगी ऑक्टोबर 2020 मध्ये देण्यात आली होती.
दिलबग सिंग यांनी सांगितले की, काश्मीरमधील सर्वसामान्य जनतेला शांतता हवी आहे. मात्र काही मूठभर दहशतवादी काश्मीरमध्ये हिंसाचार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुरक्षा दलांना या लोकांची ओळख पटली असून त्यांना वेगळे पाडण्यामध्ये यश मिळाले आहे. या दोन वर्षांमध्ये काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. काही काळातच काश्मीर पूर्णपणे शांत होईल असे त्यांनी सांगितले.