मुंबई / जालना – जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केल्याची घोषणा करण्यात आली असून, राज्य सरकारने तसे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता जालना ही 29 वी महापालिका ठरणार आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी तशी अधिसूचना जारी केली आहे. स्टील इंडस्ट्री, मोसंबीचे आगर आणि 2010 नंतर पडलेला दुष्काळ व भयान गारपिटीमुळे जालन्याची ओळख आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राजेश टोपे आणि अर्जुन खोतकरांमुळे राजकारणातही हे शहर नेहमी चर्चेत असते. जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करा, अशी जुनीच मागणी होती. अखेर ती पूर्णत्वास गेली आहे. राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून तसा प्रस्ताव मागवला होता. त्यानंतर नागरिकांकडून हरकती, सूचना मागविण्यात आल्या. या साऱ्या प्रक्रियेतून अखेर जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केल्याची घोषणा करण्यात आली. नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी तशी अधिसूचना जारी करून यावर शिक्कामोर्तब केले.
जालना जिल्ह्याने 2010 नंतर दोन ते तीन वेळेस कोरड्या दुष्काळाचा सामना केला. त्यात गारपिटीने झोडपले. तसे या जिल्ह्याची मोसंबीचे आगर ही ओळख. मात्र, दुष्काळात अनेकांनी मोसंबीच्या बागा तोडल्या आणि जाळल्या. जालना जिल्ह्यातल्या स्टील इंडस्ट्रीजची ओळख देशभर आहे. जालना जिल्हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे, दाल मिल, बी-बियाणांसाठीही जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. जालना जिल्ह्यात कुंभार पिंपळगाव, रजनी, जाफराबाद, तीर्थपुरी, नेर, परतूर, मंठा, राजूर, रामनगर, सेवली. पिंपळगाव (रेणूकाई), वालसावंगी, अंबड, घनसावंगी या बाजारपेठा प्रसिद्ध आहेत.
असा आहे जिल्हा –
जालना जिल्ह्याचे 2011 च्या जनगणनेनुसार एकूण क्षेत्रफळ 7718 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत ते 2.51 % आहे. एकूण क्षेत्रफळाच्या 1.32 % म्हणजे 102 चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व उरलेले 98.68 % म्हणजे 7616 चौ.कि.मी. क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे. जालना जिल्ह्यात भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा असे एकूण आठ तालुके आहेत. आठ तालुक्यांच्या आठ तहसीलसाठी चार उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय, जालना, अंबड, भोकरदन व परतूर येथे आहे. प्रत्येक तहसीलस्तरावर एक तहसील कार्यालय व एक पंचायत समिती कार्यालय आहे. जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या अधिपत्याखाली आठ पंचायत समित्या कार्यरत आहेत.