नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर आज सकाळी बंगळुरूमधील इस्रोच्या कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये दाखल होत शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चांद्रयानच्या टीममधील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो चे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “पंतप्रधान शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी गेले होते, आम्हाला शास्त्रज्ञांचा अभिमान आहे. देशाच्या पंतप्रधानांनी वैज्ञानिकांना भेटायला हवे, पण त्यांनी रोड शो का केला? चांद्रयानाच्या मागे देखील राजकारण लपलेले आहे का? नामकरण करण्यात भाजप वस्ताद आहे. त्याचा फायदा कसा घ्यायचा हे त्यांच्या डोक्यात कायम असतं. ज्या वैज्ञानिकांनी त्यांच्या मेहनतीने हे मिशन यशस्वी केले त्यांच्यासोबत हा रोड शो केला असता तर ती अभिमानाची गोष्ट होती. हे अभियान यशस्वी झालं याचा आम्हाला अभिमान आहे, पण पंतप्रधानांचा रोड शो राजकीयदृष्ट्या प्रेरित होता.”
दरम्यान, भारताने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चांद्रयान ३ चं सॉफ्ट लँडिंग करुन मोठा विक्रम केला होता. ज्या दिवशी ही मोहीम पार पडली, तेव्हा पंतप्रधान मोदी ब्रिक्स समिटसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे हा ऐतिहासिक क्षण पाहिला होता. यावेळी त्यांनी आपण भारतात आल्यावर पहिल्यांदा इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज सकाळी पंतप्रधान मोदी ग्रीसवरुन थेट बंगळुरूमध्ये दाखल झाले.
#WATCH | Vijay Wadettiwar, LoP Maharashtra & Congress leader, says, “…PM went to meet scientists, we are proud of scientists, the Prime Minister of the country should meet scientists, but why did he do a roadshow? It would have been a matter of pride if this road show had been… pic.twitter.com/SckFC5yg7l
— ANI (@ANI) August 26, 2023
यावेळी नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर चंद्रावर ज्याठिकाणी उतरलं आहे; त्या जागेला आता ‘शिवशक्ती पॉइंट’ म्हटले जाणार आहे. तर भारताची दुसरी चांद्रमोहीम ही अखेरच्या टप्प्यात जाऊन अयशस्वी झाली होती. चांद्रयान-2 मधील विक्रम लँडर हे चंद्रावर क्रॅश झाले होते. हे लँडर ज्याठिकाणी क्रॅश झालं, त्या जागेचंही नाव पंतप्रधानांनी जाहीर केले. या जागेला आता ‘तिरंगा पॉइंट’ म्हणून ओळखले जाणार आहे.