किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यास खासदार कोल्हे यांचा विरोध
नारायणगाव-राज्यातील 25 किल्ल्यांचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याचा राज्य शासनाच्या निर्णयाला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कडाडून विरोध केला असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल खासदार कोल्हे यांनी केला आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा 25 किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यावसायिकांना रिसॉर्ट, लग्नसमारंभ व हॉटेल उभारण्यासाठी दिले जाणार आहेत. सरकारने किल्ल्यांच्या ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रीमंडळाडून 3 सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. यानुसार एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकतं.
या किल्ल्यांवर फक्त हॉटेलच नाही तर विवाहस्थळ आणि मनोरंजन कार्यक्रमांची जागा म्हणूनही विकसित करण्याचा प्रयत्न होणार असल्याने या धोरणाला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तीव्र शब्दांत निषेध करून विरोध केला आहे. खासदार कोल्हे म्हणाले, सरकाने पर्यटनवाढीसाठी घेतलेला निर्णय संतापजनक व निषेधार्थ आहे. सरकार हे औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. छत्रपती शिवराय व त्यांच्या मावळ्यांनी बलिदान देऊन हे गड किल्ले संरक्षित केले आहेत. अशा किल्ल्यावर रिसॉर्ट, लग्नसमारंभ व हॉटेल उभारणे म्हणजे शिवराय व मावळ्यांच्या बलिदानाचा अपमान आहे. सरकारने हा निर्णय धनदांडगे व उच्चभ्रू लोकांसाठी हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा सर्वसामान्यांना काहीही उपयोग अथवा त्यांच्या आवाक्यातही नसणारा हा निर्णय आहे. गोवा, राजस्थान येथील काही किल्ले हे निवासी होते. तेथे राजे महाराजे निवास करीत होते. त्यामुळे तेथील सरकारने तसा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील किल्ले हे निवासी नसून फक्त लढवय्ये गड किल्ले आहेत. शत्रूच्या हाती गड किल्ले जाऊ नये यासाठी राजे, मावळ्यांनी संघर्ष करून किल्ले शाबूत ठेवण्याचे काम केले असताना राज्य सरकारने पर्यटनाच्या दृष्टीने किल्ल्याच्या इतिहासानुसार त्या किल्ल्याचा इतिहास, शिवसृष्टी, संग्रहालय की ज्यामुळे भविष्यातील पिढीला या किल्ल्यांच्या इतिहास माहिती होईल, त्यांना प्रेरणा मिळेल. स्थानिकांना रोजगार मिळून त्यांची उपजीविका चालेल. किल्ल्याच्या परिसरातील जैव सृष्टीची जोपासना केली पाहिजे, असे डॉ. कोल्हे म्हणाले.