नवी दिल्ली भ्रष्टाचाराच्या तक्रारी होण्याच्या भीतीने निर्णय घेण्यास आपण घाबरणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. संरक्षण उद्योगात सक्रिय सहभागासाठी त्यांनी खासगी क्षेत्राला आमंत्रणही दिले.
संरक्षण क्षेत्रातील खाजगी उद्योजकांचा फायदा घेण्यास केंद्र सरकार वचनबद्ध आहे आणि 2025 पर्यंत भारतीय संरक्षण उद्योगांना 26 अब्ज डॉलरपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यास सरकार तयार आहे, असेही सिंह म्हणाले. संरक्षण क्षेत्रातील खाजगी उद्योगांसाठी आपले दरवाजे नेहमीच खुले असतील, असे सांगत त्यांनी खासगी कंपन्यांना पुढे येण्याचे आवाहन केले. जेथे शक्य असेल तेथे सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया इंटरनॅशनल सिक्युरिटी एक्स्पोमध्ये ते बोलत होते.
भारत जास्त काळ आयात केलेल्या शस्त्रावर अवलंबून राहू शकत नाही, कारण तसे करणे जागतिक महासत्ता होण्याच्या देशाच्या भूमिकेशी सुसंगत नाही. जेव्हा अपण संरक्षणमंत्री झालो तेव्हा कोणास भेटावे याची काळजी घ्यावी कारण त्यामुळे भ्रष्टाचाराच्या तक्रारी होऊ शकतात, असे लोकांनी आपल्याला सांगितले होते. मात्र आपण त्याची पर्वा करत नसल्याचेही त्यांनी सांगितले.